पोलीस निरीक्षकांमुळे मनपरिवर्तन झाले; दारूवाल्याने चक्क चहाचे हॉटेल सुरू केले!
अॅड. विजय सोनवणे : महान्यूज लाईव्ह
नगर : संसार उध्वस्त करते दारू; दारूला स्पर्श नका करू.. ही जाहिरातही अनेकांनी मागे वर्षानुवर्षे दूरचित्रवाहिनीवर पाहिलेली आठवत असेल… अन अलिकडे प्रत्येक महिन्याला गावठी हातभट्टीवर कारवाई केल्याचे पोलिसांचे फोटो आणि गुन्हे दाखल झालेल्यांची माहिती आजही अनेक जण वाचत असतील… कायद्याच्या धाकाच दृष्टीने हे बरोबरच असले तरी देखील चंद्रशेखर यादवांसारखा एखादा पोलीस निरीक्षक चाकोरीच्या बाहेर जाऊन जग बदलण्याची संकल्पना आखतो; तेव्हा मात्र सलाम करण्याची वेळ आपल्यावर येते! कारण त्यांच्या संकल्पनेतून वर्षानुवर्षांचे गावठी हातभट्टीचे अड्डे बंद करून त्याऐवजी चहाचे हातगाडे सुरू करण्याची किमया साधलेली असते..!
पुराणकाळात वाल्याचा वाल्मिकी झाला; पण वर्तमानकाळात एखाद्या हातभट्टी चालकास; एखाद्या वाळूमाफिया किंवा एखाद्या मटकाचालकास त्याचा धंदा सोड असे सांगितले तर तो सहजासहजी तयार होईलच असे नाही. या उलट अनेक गुन्हे अंगावर घेण्याची तयारी या लोकांची असते, मात्र गुन्हेगारीच्या उकिरड्यातून बाहेर येण्याची त्यांची तयारी नसते.
त्यामुळेच पोलिस देखील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी यांना बदलवण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा थेट कारवाया करून मोकळे होतात. त्यामुळेच कर्जत सारख्या वर्षानुवर्षे दुष्काळी भाग म्हणून गणल्या गेलेल्या भागात पोलिस निरीक्षक पदाची जेव्हा सूत्रे हाती घेतली.
तेव्हा खाजगी सावकारकीच्या जोखडातून मुक्त केलेल्या कुटुंबांचा समाधानाचा निश्वास अनेकांनी अनुभवला आणि प्रत्येक वेळी कायद्याच्या चाकोरीवर बोट ठेवूनच काम करावे असे नाही तर कधीकधी लोकहितासाठी, समाज हितासाठी लोकांच्या पोटात शिरून, त्यांना आपलेसे करून त्यांच्यामध्ये बदल घडविण्याची किमया साधणे याला देखील उत्तम ‘पोलीसिंग’च म्हणतात, ते चंद्रशेखर यादव यांनी मनापासून साधले.
गेल्या काही महिन्यांपासून कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे प्रसारमाध्यमांमध्ये आणि लोकांमध्ये चर्चेत आहेत. यामागे त्यांना प्रसिद्धीची हौस आहे असे नाही, तर त्यांनी केलेली कामे जनहिताची, लोकहिताची व मुळापासून कायदा व सुव्यवस्था उत्तमरित्या राखण्याची कामे आहेत.
त्यांनी यापूर्वी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण सारखे गाव देखील अशाच पद्धतीने आपलेसे केले होते. एकाच ठिकाणाहून संपूर्ण गावातील चौकावर नियंत्रण ठेवणारी साधने त्यांनी लोकसहभागातून उभी करून भिगवण हे सीसीटीव्हीच्या नजरेतील गाव म्हणून राज्यात प्रसिद्ध केले होते.
खरंतर हा काही पोलीस निरीक्षकाच्या कामाचा भाग नव्हता, मात्र लोकांच्या समाधानासाठी, लोकांच्या हितासाठी आपण सदैव दक्ष आहोत आणि पोलीस सदैव दक्ष असतो याचे उत्तम उदाहरण त्यांनी वेळोवेळी घालून दिले होते. तसेच उदाहरण त्यांनी नुकतेच कर्जतमधील खाजगी सावकारांच्या जोखडातून मुक्त केलेल्या कुटुंबाच्या बाबतीत घालून दिले. त्यांनी साधलेली प्रत्येक दिवसाची किमया कुणा एखाद्याच्या आयुष्यात आमूलाग्र परिवर्तन करून जाताना दिसते.
कर्जत येथे पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे कारवाया करत असताना ते अनेकांची मने वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘अवैध व्यवसायामुळे समाजात आपली प्रतिमा मालिन होते, मान-सन्मान मिळत नाही, त्यामुळे सन्मानजनक व्यवसाय करून आपण जबाबदार नागरिक आहोत अशी ओळख निर्माण करून द्यावी’ असे प्रत्येकवेळी अवैध व्यावसायिकांना ते मार्गदर्शन करतात.
प्रसंगी त्यांनी अनेकांवर मोठ्या कारवायाही केल्या. पण त्यांची समाजाप्रती असलेली तळमळ कधीही लपून राहिली नाही. आता उदाहरण द्यायचे झाले, तर कर्जत शहरातील बाळासाहेब माने हे अवैध दारूविक्री करत होते. त्यामुळे त्यांच्यावर यापूर्वी वारंवार कारवाया करण्यात आल्या होत्या. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी माने यांना पोलीस ठाण्यात बोलावून ‘तुम्ही अवैध धंदे करू नका’ अशी वेळोवेळी समज दिली.
चांगला व सन्मानजनक व्यवसाय करा, मी आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला मदत करेल असे वेळोवेळी त्यांना सांगून जबाबदार नागरिकाची भावना पटवून दिली. अन् चंद्रशेखर यादव यांची ही तळमळ दारूविक्री व्यवसाय करणारे बाळासाहेब माने यांचे मनपरिवर्तन करणारी ठरली.
त्यांनी भांडेवाडी येथे करमाळा रस्त्यालगत श्री साई कृपा नावाने चहाचे हॉटेल सुरू केले.
हे चहाचे हॉटेल सुरू केल्यानंतर त्यांनी त्याची कल्पना चंद्रशेखर यादव यांना दिली आणि यादव स्वतः सहकाऱ्यांना बरोबर घेऊन त्यांच्या हॉटेलवर जाऊन चहाची चव चाखून आले. यादव एवढ्यावरच थांबले नाहीत, या नवीन व्यवसायाकरिता शुभेच्छाही दिल्या. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पत्रकार आशिष बोरा, गणेश जेवरे हे उपस्थित होते.











