मला भेटलेली माणसे : घनश्याम केळकर
परिक्रमा दिवस ३९ वा. दि. २० डिसेंबर
मुक्काम कोल्हापूर
एखादा दिवस असा असतो की आपली अवस्था ” देणाऱ्याचे हात हजार, दुबळी माझी झोळी” अशी होते. आजचा दिवस त्यातला होता. आज इतक्या वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या आणि ऐकल्या की हृया सगळ्या कशा आणि कुठे साठवाव्या याची चिंता मेंदुतल्या सॉफ्टवेअरला पडली असेल.
सकाळीच सुषमा शितोळे मॅडमची भेट झाली. आत्मचरित्र, कथा, पटकथा, वृत्तपत्र, वेबसिरीज अशा अनेक लेखन माध्यमांमध्ये लेखन व संपादनाचे काम त्या करीत आहेत. नुकतेच एका मान्यवर प्रकाशकांच्या आत्मचरित्राचे काम संपवून आता त्या ओटीपी प्लॅटफॉर्मवर येऊ घातलेल्या मराठी सिरियलसाठी लेखन करत आहेत. मासिक पाळी या चर्चाविश्वाच्या बाहेरच्या विषयावर मराठी चित्रपट काढण्याचे डेरींग एका कोल्हापूरकराने दाखवले. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि निर्मितीप्रक्रियेत सुषमा मॅडमचा मोठा सहभाग राहिला. काही कारणाने हा चित्रपट अजून अपूरा राहिला आहे. त्याची जी थीम मला सांगितली गेली त्यावरुन जेव्हा कधी हा चित्रपट प्रदर्शित होईल त्यावेळी त्याला चांगला प्रतिसाद मिळेल यात शंका नाही.
दुसरी भेट कण्हेरी मठाची. बारामतीच्या कृषी विकास प्रतिष्ठानमध्ये प्रल्हाद जाधव सर काम करत होते, तेव्हापासून आमची ओळख. ते सध्या कण्हेरी मठात मोठी जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांनी स्वत: बरोबर येऊन मठातील विविध विभाग दाखवले. स्वामीजींची भेट करून दिली. अठरा विद्या आणि चौसष्ठ कला शिकवणारे प्राचिन गुरुकुलाची ओळख सांगणारे विद्यालय. आयुर्वेदिक आणि आधुनिक उपचार करणारे अद्ययावत दवाखाने, गोशाळा, शेतीतील विविध प्रयोग, प्राचिन संस्कृती आणि आधुनिक जग यांना एकत्र आणण्याचे प्रयोग. उपलब्ध थोड्याशा वेळात काय काय पहायचं आणि काय समजून घ्यायच अस होऊन गेले. मठात उभे राहत असलेले भव्य दिव्य उद्यान पाहून थक्क व्हायला झाले. ज्यावेळी हे पुर्णपणे तयार होईल त्यावेळी बघण्यासाठी देश विदेशातून लोक येतील यात शंकाच नाही.
यानंतर कोल्हापूरात आल्यावर भेटले अनील चौगुले सर! नष्ट होत चाललेल्या रानभाज्यांच्या संवर्धनापासून सोलर ड्रायरच्या साह्याने नाशवंत शेतमालाचे टिकावु पदार्थात रुपांतर करण्याच्या प्रयोगापर्यंत सरांच्या विचाराची रेंज आहे. भाषणबाजीपेक्षा प्रत्यक्ष कृती करणं त्यांना आवडतं.
कचऱ्याची विल्हेवाट न लावता व्यवस्थापन केले तर घनकचऱ्यातून ” धन” कचरा तयार होऊ शकतो हे त्यांनी सप्रमाण सिद्ध करुन दिले आहे. कोल्हापूरच्या देवीच्या मुर्तीच्या एका हातात म्हाळुंगीचे फळ आहे. गावाच्या नावात म्हाळुंगी असलेली तीन चार गावे कोल्हापूरच्या आसपास आहेत. पण म्हाळुंगीचे झाड दाखवायलाही नाही. अशाच वनस्पतींवरुन ज्या गावांची नावे आहेत, त्या गावांचा शोध सध्या ते करीत आहेत.
काॅंग्रेस गवतासारखी रानमोडी नावाची वनस्पती सगळ्या रानाच्या मुळावर उठली आहे, तिचा नायनाट करण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ते ३१ डिसेंबरपूर्वी काही दिवस आपल्या दहा वीस विद्यार्थ्यांसह कोठल्यातरी तालुक्यात शिरतील, बांधाबांधावर जाऊन शेतकऱ्याला रानमोडीची ओळख करून देतील आणि जेवढी जमेल तेवढी उपटून नष्ट करायला लावतील. मग कोठल्यातरी खेड्यातल्या गावकऱ्यांसोबत एक लढाई जिंकल्याच्या आनंदात ३१ डिसेंबरची रात्र घालवतील.
रासायनिक रंगांऐवजी झाडा फुलांपासून बनविता येणारे नैसर्गिक रंग बनविण्यास आणि वापरण्यास प्रोत्साहन देणे. आठवडी बाजारात शिल्लक माल शेतकरी सोडून जातो आणि तोही कचऱ्यात जातो. तो माल ताब्यात घेऊन गरजवंतापर्यंत पोचवणे आणि खुप काही ते सांगत होते.
माझी आणि त्यांची भेट अवघी दोन अडिच तासांची. सुरवातीची पंधरा वीस मिनिटे सोडली तर ते बोलत होते आणि मी ऐकत होते. एकामागून एक वेगवेगळे विषय ते सांगत होते आणि हे सगळं माझ्या लक्षात राहिल का आणि समजून घेता येईल का ही चिंता अधूनमधून मला सतावत होती.
त्यांनी स्वत: बनविलेल्या काढ्यासाठीच्या चूर्णाची डबी दिली आणि परत मागितलीत तर मिळणार नाही, यावर कृती दिली आहे, त्याप्रमाणे घरच्या घरी चूर्ण तयार करा अशी प्रेमळ धमकीही दिली. दोन वर्षांपूर्वी सोलर ड्रायरमध्ये ड्राय करुन ठेवलेल्या चिकुची चव चाखली. नैसर्गिक अष्टगंध ज्यापासून बनते त्या त्यांच्या दारात लावलेल्या झाडाची दोन फळे घेतली.
अजुनही घेण्यासारखे खुप काही आहे. त्यांनी सांगितलेल्या पैकी अनेक मुद्दे आता लिहितानाही निसटुन गेल्याची भीती आहेत. त्यामुळे ” और एक मुलाकात जरुरी है. ” तुम्हाला सरांशी अशी मुलाकात करायची असेल तर मला ९८८१०९८१३८ या नंबरवर संपर्क साधा.
उद्याचा मुक्काम अतिग्रे, ता. हातकलंगणे, जि. कोल्हापूर











