बारामती म्हटले की, 300 वर्षापूर्वीच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सुपे परगणा, कवी मोरोपंतांच्या आर्या आणि अलिकडील ५० वर्षातील राजकारण, समाजकारणात राज्य व देशात सातत्याने चर्चेत असलेल्या पवार कुटुंबियांची ओळख सांगितली जाते. बारामती हे तालुक्याचे ठिकाण आज देशाच्या नकाशावर आहे, ते येथील नेतृत्वाबरोबरच कृषी व शिक्षण क्षेत्रात असलेल्या उल्लेखनीय कामामुळे!
बारामतीतील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, विद्या प्रतिष्ठान, माळेगावच्या शिवनगर विद्या प्रसारक मंडळापासून ते सोमेश्र्वर शिक्षण मंडळ, अनेकांत एज्युकेशन सोसायटी अशा अनेक संस्थांनी शैक्षणिक क्षेत्रात कळसाध्याय रचला आहे. राज्यातील एकमेव महिला सबलीकरणावर भव्यदिव्य सुरू असलेले काम बारामतीतच आहे. येथूनच मोफत शिक्षण घेऊन आठशेहून अधिक मुली महिला पोलिस झाल्या. येथून संपूर्ण राज्यातील शेतकरी प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा मंत्र घेऊन जातात. याच बारामतीने संपूर्ण राज्याला ठिबक दिले…याच बारामतीने फळांमध्येच नव्हे तर अगदी भाजीपाल्यातही कलमाची रोपे तयार करून दिली. अगदी तीस, चाळीस फूटापर्यंत वाढणारी भाजीपाल्याची रोपे याच बारामतीतून लाखो शेतकरी पाहतात..कृषी क्षेत्राची पंढरी म्हणून बारामती राज्यात ओळखली जाते..
आज बारामतीत कृषी व शिक्षणाचे नंदनवन उभे राहीले आहे. या नंदनवनाला भेट द्यायला राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून देशविदेशातील नेते, तज्ज्ञ दरवर्षी भेट देतात. हे नंदनवन राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अधुनिकतेचा, आर्थिक व सामाजिक विकासाचा मंत्र बनले आहे. येथूनच राज्याला पाझर तलावाची संकल्पना मिळाली. येथूनच राज्याला लाखो नव्हे कोट्यवधी लिटर पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या अधुनिक शेततळ्यांचा वसा मिळाला. देशातील पहिले आंतरराष्ट्रीय कृषी पदवीचे अभ्यासक्रम येथेच सुरू झाले.
येथून संकरीत गायींच्या गोठ्यांचा प्रसार झाला. मुक्त गोठ्याला येथून पाठबळ मिळाले. उन्हाळ्यातल्या मुरघासाचा प्रभावी वापर कसा करावा याचाही मंत्र मिळाला. येथून दुष्काळात ताण धरलेल्या वनस्पतींचा स्विकार करावा असा मंत्र शेतकऱ्यांना मिळाला. कमी पावसाच्या काळातील मृदजलसंधारणाचा मंत्रही येथूनच व्यापक प्रमाणात पोचला. रेशीम शेतीलाही येथूनच सुरवातीचे पाठबळ मिळाले. पाण्याच्या उपयुक्ततेवर अधिक काम येथेच झाले, या अशा एक ना अनेक बाबींचा उल्लेख येथे करावा लागेल, त्यासाठी पानेही अपुरी पडतील.
अर्थात आजची बारामती ही सधन, संपन्न असली तरी या बारामतीची वाटचाल काही एका दिवसांत झाली नाही. तिथे खूप कष्टावे लागले आणि आजची बारामती जी हिरवीगार दिसते, ती तशी यापूर्वी नव्हती. येथे प्रचंड दुष्काळी स्थिती कायमची असायची. एक कायमचा दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या या बारामतीचे रुपडे बदलण्यात सन १९६६ पासून तत्कालीन युवा नेतृत्व शरद पवार व नंतरच्या काळात कृषीतज्ज्ञ डॉ. अप्पासाहेब पवार यांनी प्रचंड कष्ट घेतले. त्या जोरावर हळूहळू बारामतीचे चित्र बदलत गेले. एखाद्याला प्रश्न पडू शकतो की, बारामतीचा फक्त तालुका बदलायचा होता, राजकारणात पवार कुटुंब दिर्घकाळ सत्तेत होते, मग या ५० वर्षात त्यांनी हे चित्र बदलले तर काय झाले? पण एक गाव बदलणाऱ्यांना ते गाव कसे बदलले, यापेक्षा ते तसेच शाश्वत ठेवणे किती अवघड असते याची चांगलीच कल्पना आहे. बारामती तालुक्याला शून्यातून पुढे आणताना पहिल्यांदा केलेले प्रयोग लोकांमध्ये ठसविणे, ते विश्वासार्ह असल्याची खात्री पटवणे, मग त्याचा प्रसार करणे, तो प्रयोग शेतकरी, ग्रामस्थांनी स्विकारणे हे काम खूपच अवघड असते. ते फक्त राजकारणातून करणे सोपे नाही, त्याला समाजकारणाचीच जोड असावी लागते. पवार कुटुंबाने गेल्या चाळीस वर्षात राजकारणापेक्षा समाजकारणाला दिलेले महत्व आणि झोकून देऊन केलेले काम यातूनच हे शक्य झाले. पवार कुटुंबाची दूरदृष्टी राहील्यानेच येथील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास झाला. जोडीला सहकारी चळवळ रुजली. व्यापारपेठा मजबूत झाल्या, रोजगारात वाढ झाली. शेतीवरील प्रक्रिया
उद्योग वाढले. केवळ शेतीच्या विकासापुरते मर्यादित न राहता महिला सबलीकरणावर दिलेला भरही खूप महत्वाचा ठरला. एकूणच जनजीवनावर परिणाम करणाऱ्या या सायलंट चळवळीत सर्वाधिक काम जलसंधारण, कृषी, नवतंत्रज्ञानाचा स्विकार, शैक्षणिक प्रगती, महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरण, बालशिक्षण, आरोग्य अशा प्रमुख मुद्द्यांवर झाले. बारामतीत आल्यानंतर कोणत्याही गोष्टीतून काही तरी संदेश घेऊन जावासा प्रत्येकाला वाटतो यातच हे सारे यश दडलेले आहे. खरेतर त्याची कधी प्रसिध्दी पवार कुटुंबाने मिरवली नाही. त्या प्रसिध्दीझोतापासून हे कुटुंब कायम अलिप्तच राहीले. त्यामुळे पवार कुटुंबाचे राजकारण संबंध राज्याला व देशाला दिसले असले तरी त्यांची ही समाजकारणाची व माणसांमधील आर्थिक, सामाजिक विकास साधण्याची बाजू आजही समाजापुढे तेवढी प्रकर्षाने पुढे आलेली दिसत नाही. बारामतीत नामवंत, मान्यवर मंडळी नेहमीच येतात. मात्र बुध्दीजीवी वर्गाला आजही बारामती म्हणजे राजकारण असे चित्र दिसत असेल तर त्यात नवल वाटायचे कारण नाही, मात्र बारामतीतील कृषी क्षेत्रात होणारे काम, महिलांना आधार, पाठबळ देऊन स्वबळावर त्यांचा उद्योजकापर्यंतचा घडवून आणला जात असलेला प्रवास हे काम आश्चर्यकारक आहे. इथे अत्यल्प उत्पन्न गटातल्या मुली येतात, मोफत शिक्षण घेऊन सरकारी नोकरी मिळवतात, हा प्रवास विस्मयकारक असाच आहे. अधुनिक शेतीला वरदान असलेल्या व शेतकऱ्यांचे आयुष्य समृध्द करणाऱ्या शेतीपासून शिक्षणापर्यंतच्या येथील चळवळीचा संपूर्ण इतिहास समजून सांगण्याची गरज आहे. आजचा वर्तमानकाळ जसा सर्वांना परिचित आहे, तसा भूतकाळ सर्वांनाच परिचित नाही. तो भूतकाळ मांडून वर्तमानाच्या स्थितीतील प्रत्येक कंगोरे राज्यातील बुध्दीवंतांपर्यंत पोचावेत यासाठीची सुरवात करावी लागेल, ती बारामतीतल्या पूर्वीच्या ब्लॅक अॅण्ड व्हाईटच्या युगापासून!











