मुंबई : महान्यूज लाईव्ह
गड्यांनो, गाव कारभारी होण्यासाठी तुम्ही भरपूर मेहनत घेतली.. आतापासूनच भरपूर खर्च केला आहे.. दररोज तुमच्या मोकळ्या होत चाललेल्या खिशांमुळे आणि वाढत झालेल्या गर्दीमुळे हॉटेल भरून वाहत आहेत.. मंदीच्या काळात देखील आणि तिकडे युद्धाचे ढग असताना देखील इकडे मात्र पैशाचा पाऊस पडत आहे.. पण आमचा नाईलाज आहे.. कारण अडचण आहे ती sir आणि गुरुजींची.. भावांनो, तुमच्यासाठी गुरुजी फार मेहनत घेत आहेत.. वेळेत काम करण्यासाठी झपाटलेत.. पण वेळ लागतोय (sir)सरांमुळे..!
राज्यातील सुमारे १३ हजार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रतीक्षा आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष मतदार यादी पुनरीक्षण (Special Intensive Revision-SIR) मोहीम सध्या सुरू असल्याने निवडणूक प्रक्रिया जानेवारीनंतरच राबविण्यात येण्याची शक्यता असून त्याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडूनही स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांचे वेळापत्रक लांबणीवर पडण्याची चर्चा राज्यभर सुरू झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी विशेष पुनरीक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान नव्या मतदारांची नोंदणी, मृत व स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, हरकती व दावे स्वीकारणे तसेच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. राज्यातील हजारो ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपत आला असून अनेक ठिकाणी प्रशासकांच्या माध्यमातून कारभार सुरू आहे.
अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. मात्र मतदार यादीचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचा आयोगाचा निर्णय असल्याने निवडणूक प्रक्रिया काही काळ पुढे जाणार असल्याचे संकेत आहेत. निवडणुका पुढे गेल्यास इच्छुक उमेदवारांना जनसंपर्कासाठी अधिक वेळ मिळणार असला, तरी अनेक गावांमध्ये निवडणुकीची उत्सुकता आणखी वाढणार आहे. विविध राजकीय पक्षांनीही ग्रामीण भागात संघटनात्मक हालचालींना वेग देण्यास सुरुवात केली असून संभाव्य उमेदवारांकडूनही तयारी सुरू झाली आहे.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाकडून अद्याप अंतिम निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे निवडणुकीच्या तारखा, उमेदवारी अर्ज, मतदान आणि मतमोजणीबाबतची अधिकृत घोषणा झाल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांबाबत सर्वांचे लक्ष आयोगाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.










