इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीची घोषणा; महावितरणविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन
डॉ. संदेश शहा, इंदापूर
स्मार्ट वीज मीटर बसविण्याच्या प्रक्रियेविरोधात इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने शनिवार, ४ जुलै २०२६ रोजी स्वयंस्फूर्तीने इंदापूर बंद पाळण्याचे आवाहन केले आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना वाढीव वीजबिले येत असल्याचा आरोप करत समितीने महावितरणच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.
समितीचे संस्थापक कृष्णा ताटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्यात नागरिकांच्या पूर्वसंमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविले जात असून, याबाबत महावितरणकडे अनेकदा तक्रारी व निवेदने देऊनही त्याची दखल घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. सुस्थितीत असलेले मीटर ग्राहकांच्या संमतीशिवाय बदलण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे, असेही त्यांनी म्हटले.
ताटे यांनी पुढे दावा केला की, स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांना अवास्तव वीजबिले येत असून, जुन्या मीटरचे रीडिंगही चुकीचे दाखविले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेस हमीद आतार, महादेव चव्हाण, भारत बोराटे, हाजी सलीम बागवान, हनुमंत बोंगाणे, फकीर पठाण, सूर्यकांत गुंड, चंद्रकांत देवकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.











