नाशिक : महान्यूज लाईव्ह
नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील मोहनदरी येथील शासकीय आदिवासी निवासी आश्रमशाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आल्यानंतर आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींची सुरक्षितता, आरोग्य तपासणी व्यवस्था आणि प्रशासकीय देखरेखीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्राथमिक तपासात संबंधित विद्यार्थिनीवर तिच्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. मात्र या घटनेतील सर्वात गंभीर बाब म्हणजे विद्यार्थिनी गर्भवती असताना शाळा, वसतिगृह प्रशासन, संबंधित अधिकारी आणि आरोग्य यंत्रणेला याची कुठलीच कल्पना कशी आली नाही?
निवासी आश्रमशाळांमध्ये नियमित आरोग्य तपासणी, समुपदेशन आणि विद्यार्थिनींची देखरेख होत असेल तर इतकी मोठी घटना शेवटच्या टप्प्यापर्यंत दडून कशी राहिली असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण, शिक्षण आणि संरक्षण देण्यासाठी उभारलेल्या आश्रमशाळांमध्येच अशी घटना घडणे ही संपूर्ण व्यवस्थेसाठी अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे.
या प्रकरणात केवळ आरोपीवर कारवाई करून थांबणे पुरेसे नसून संबंधित शाळा प्रशासन, वसतिगृह व्यवस्था, आरोग्य विभाग आणि जबाबदार अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेनंतर आदिवासी विकास विभागाने चौकशी सुरू केली असून संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात आला आहे.
दोषी आढळणाऱ्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई व्हावी तसेच राज्यातील सर्व निवासी आश्रमशाळांमध्ये सुरक्षा, आरोग्य तपासणी, समुपदेशन आणि देखरेख व्यवस्थेचे तातडीने विशेष लेखापरीक्षण करण्यात यावे अशी मागणी सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून होत आहे.
मोहनदरीतील ही घटना केवळ एका विद्यार्थिनीची शोकांतिका नसून आश्रमशाळांमधील सुरक्षा व्यवस्थेतील संभाव्य त्रुटींचा गंभीर इशारा आहे. या घटनेतून प्रशासनाने धडा घेत ठोस सुधारणा केल्या नाहीत तर अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची खात्री कोण देणार हा प्रश्न आता संपूर्ण समाजासमोर उभा राहिला आहे.











