देशातील भावी पिढी असलेल्या झुरळांनी सुरू केलेले आंदोलन सरकारच्या अंगाखांदयावरून सरकारची झोळी उठवण्यापर्यंत पोहोचले, तरी देखील सरकारला जाग येईना.. अखेर संपूर्ण देशात हे आग्या मोहोळ उठल्याचे दिसताच आणि जागोजागी दिसतील तिथे भाजपच्या समर्थकांना मारायला सुरुवात करताच सरकार जागे झाले. आज दुपारी धर्मेंद्र प्रधानांनी त्यांच्या शिक्षण मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
नीट परीक्षेत पेपर लीक झाल्यानंतर तब्बल 21 विद्यार्थ्यांनी देशभरात आत्महत्या केली. यानंतर देशात प्रचलित शिक्षण व्यवस्थेविरोधात प्रचंड संताप सुरू झाला आणि हळूहळू विद्यार्थी रस्त्यावर उतरू लागले. सुरुवातीला हलक्यात घेतलेल्या सरकारने दिसतील तिथे विद्यार्थी हुसकवायला सुरुवात केली. या विद्यार्थ्यांना कोणीही मदत करणार नाही अशा स्वरूपाची व्यवस्था करण्यास सुरुवात केली.
तेवढ्यावर न थांबता लडाखचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पुढे येऊन विद्यार्थ्यांसमवेत उपोषणाला सुरुवात केली. त्यांचे उपोषण देखील हलक्यात घेण्यास सरकारने सुरुवात केली. तब्बल वीस दिवसानंतर जेव्हा सोनम वांगचुक यांची प्रकृती पूर्ण खालावली, तेव्हा घाबरलेल्या सरकारने अत्यंत निगरगट्ट पद्धतीने व संवेदनाहीन माणुसकी दाखवून त्यांना दयामाया न दाखवता उचलून नेले आणि जबरदस्तीने सफदरजंग इस्पितळात दाखल केले. या घटनेने मात्र मग दिल्ली हादरली आणि दिल्लीतून विद्यार्थ्यांनी दिसेल तिथून जंतर-मंतरवर धाव घेतली.
दुपारनंतर हे आंदोलन तीव्र होत गेले. लाखोंचा समुदाय जमा होण्यास सुरुवात झाली आणि जे व्हायला नको ते घडले. पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. व्हिडिओ समाज माध्यमात तात्काळ व्हायरल झाले आणि संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. दुसरीकडे त्याच वेळी पोलीस मारहाण करत असताना शांतपणे मारा-मारा म्हणणारे विद्यार्थी दिसल्याने लोकांच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली आणि सरकारविरोधात संपूर्ण देशभरातच अत्यंत तीव्र असंतोषाचे वातावरण तयार झाले.
या आंदोलनाचे लोण दिल्लीपाठोपाठ बिहारमध्ये, राजस्थानमध्ये, महाराष्ट्रामध्ये पसरले. पंजाब मध्ये देखील पसरले आणि याचा वणवा भडकला. गेल्या दोन दिवसापासून संपूर्ण देशातील तरुणाई रस्त्यावर उतरू लागल्याने आणि दिसेल तिथे भाजपाचे नेत्यांवर राग निघू लागल्याने सरकारला बुडाखाली काय जळते आहे त्याची जाणीव झाली आणि तब्बल 25 दिवसानंतर मन की बात करणारे देशाचे पंतप्रधान जागे झाले.
त्यांनी एक व्हिडिओ जारी केला. त्यानंतर लागलीच दुसरा व्हिडिओ जारी केला आणि तरीदेखील आज दुपारी धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावाच लागला. कारण उद्या मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचे आंदोलन होणार होते, तर दुसरीकडे बिहारमध्ये आंदोलनाने हिंसक वळण घेतले होते. त्याचा वणवा जर संपूर्ण देशभरात भडकला तर नेपाळ आणि श्रीलंकेसारखी परिस्थिती झाली असती.











