मुंबई महान्यूज लाईव्ह
यंदाचा साखर गाळप हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू करायचा की नोव्हेंबरमध्ये, याबाबतचा निर्णय बुधवारी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली साखर हंगामाचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
देशातील साखरेचा तुटवडा आणि किरकोळ बाजारातील वाढलेले दर लक्षात घेता, आगामी दसरा व दिवाळीच्या काळात बाजारात नवीन साखर उपलब्ध व्हावी आणि दर नियंत्रणात राहावेत, यासाठी केंद्र सरकारकडून ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याचा आग्रह आहे.
मात्र, राज्यात यंदा पावसाची मोठी तूट राहिल्याने उसाची वाढ अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये गाळप सुरू केल्यास उसाचे वजन तसेच साखर उताऱ्यात घट होण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकरी आणि साखर कारखान्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.
ऑक्टोबरमध्ये गाळप सुरू केल्यास साखर उतारा सुमारे १ ते १.५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता असून, कारखान्यांना प्रति टन ४५० ते ५०० रुपयांपर्यंत फटका बसू शकतो. तसेच उसाच्या वजनात १० ते १२ टक्क्यांची घट होऊन शेतकऱ्यांना प्रति टन सुमारे ३०० ते ३५० रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ऑगस्टमध्ये साखरेचे किरकोळ दर ७० ते ७५ रुपये किलोपर्यंत पोहोचले होते. सरकारच्या उपाययोजनांनंतर हे दर सध्या ५० ते ५५ रुपयांवर आले आहेत. आगामी सणासुदीच्या काळात पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून हंगाम लवकर सुरू करण्यावर भर दिला जात आहे.
या पार्श्वभूमीवर बुधवारी होणाऱ्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषी व सहकार विभागाचे मंत्री तसेच साखर कारखान्यांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत साखर कारखान्यांची धुराडी ऑक्टोबरमध्ये पेटणार की नोव्हेंबरमध्ये, यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.











