बारामती : महान्यूज लाईव्ह
पुण्यातील विषारी दारुकांड प्रकरणाच्या तपासावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकार आणि पोलिस यंत्रणेवर जोरदार टीका केली आहे. पुण्याच्या पोलीस मुखियाला हे प्रकरण जमणार नसल्याचे माहित असल्यानेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास CID कडे सोपवण्याचा निर्णय घेतला. यामागे पुणे पोलिसांच्या नेतृत्वाला तपास करण्यात अपयश आल्याचे दिसत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सोशल मीडियावरील पोस्टमध्ये रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाचा संदर्भ देत CID तपासाच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केले. पुणे विषारी दारुकांडातही कुणाला वाचवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.
पुढे त्यांनी राज्यातील पोलीस ठाण्यांवर गंभीर आरोप करत, चोरी, पाकिटमारी, चेन स्नॅचिंग यांसारख्या गुन्ह्यांच्या तपासाची जबाबदारीही CID कडे सोपवावी, असा उपरोधिक टोला लगावला. तसेच अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास विधानसभेत दिलेल्या आश्वासनानुसार CBI कडे द्यावा, अशी मागणीही त्यांनी पुन्हा केली.
रोहित पवार यांनी काही पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे प्रामाणिक पोलिस दलाची प्रतिमा मलिन होत असल्याचे नमूद करत, पोलिसांनी राजकीय दबाव झुगारून महाराष्ट्र पोलिसांचा अभिमान उंचावेल असे काम करण्याचे आवाहन केले. दरम्यान, पुणे विषारी दारुकांडाच्या तपासावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, रोहित पवार यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.











