विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : काही जण म्हणतात की, माझ्या वडिलांनी तुमचं काम केलं. आम्ही तुमचं काम केलं. आम्ही पिढ्यानपिढ्या तुमचं काम करतोय. जसं तुम्ही माझं काम करताय, तसं मी बारामतीकरांसाठी भरभरून काम केलं आहे. पाच वर्षात जर पाच हजार कोटी मंजूर करून आणले नाही, तर अजित पवार नाव सांगणार नाही. १९७८ पासून दूध संघाचे का काम झालं नाही? बारामतीकरांनो माझ्यासारखा आमदार परत कधीच होऊ शकत नाही. बाकीच्यांचा घास नाही घास. मला लोकांनी लाखापेक्षा जास्त मतं दिली आहेत. असं पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेत.
बारामती तालुक्यातील माळेगांव सहकारी साखर कारखाना परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नूतनीकरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. पुढे बोलताना पवार म्हणाले, मी माझा १९९० चा स्वभाव किती बदलला आहे. आता बदलू नका. नाहीतर अधिकारी ऐकायचं नाहीत अस लोकं म्हणतात. खासदार चुकीचा निवडून दिला तर चार-पाच काम कमी होतील. जर विधानसभा आमदार चुकीचा निवडून दिला तर तुमच्या प्रपंचावरती काही परिणाम होणार आहे की नाही?
कारखाना जर चुकीच्या हातात गेला तर तुमच्या प्रपंचावर परिणाम होईल. मी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या लोकांना सांगू इच्छितो की, मी भावावर कोणताही परिणाम होऊ देणार नाही. माझी मोदी आणि शाह यांच्याशी ओळख आहे, हे तुमच्या आतापर्यंत लक्षात आलं असेलच. केंद्रात काम असेल तर आपल्याकडूनच होणार, राज्यात काम असेल तर आपल्याकडूनच होणार, सहकार खात्यात काही काम असेल तरी आपल्याकडूनच होणार. परंतु इतरांचं तसं नाही. कारखान्याचा इन्कम टॅक्स फक्त अमित भाईमुळे निघाला. १५ ते २० वर्ष हे चाललं होतं. भावनिक होऊ नका. हे आधीच्या काळात का नाही झालं? असही अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, राज्य सरकारने धोरण घेतला आहे की, कॅनलमधून पाणी न देता बंद पाईपलाईनद्वारे पाणी द्यायचं. मी काही गोष्टी सांगत नाही. कारण मी बोललो की, हे लगेच टीव्हीला दाखवतात. त्याचा मला दुसरीकडे त्रास होतो. जून पर्यंत तुमचे कॅनल बंद होणार नाहीत. आता म्हणाल कॅनलवरची कनेक्शन तोडू नका. बाकीच्या लोकांचा पण विचार करा की, दत्तात्रय भरणे यांनी काय तिकडे हाताला चुना लावत बसायचं का? काही जण येतात, संचालक मंडळाला भेटतात आणि सांगतात दर वाढवून द्या.
दर वाढवून द्यायला पैसे तरी हवेत ना. काही वळत नाही, कळत नाही आणि दाखवायचे आम्ही शेतकऱ्यांसाठी काहीतरी करतोय. सुरुवातीच्या काळात माळेगाव कारखाना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालत होता. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. प्रत्येकाचा काळ असतो. आम्ही पण बारकाईने विचार करतो. नदीच्या पाण्याचा प्रश्न आहे. नदीच्या पाण्याला मी एकटा जबाबदार आहे का? अनेकांनी या आधी याचे नेतृत्व केले आहे. नीट करायला वेळ लागेल. मी म्हटलं होतं, नीट करतो. परंतु नीट करायला गेलो की, प्रदूषण बोर्ड सगळ्यांना नोटीस काढेल.
अनेक कारखाने बंद पडतील. परत मीच केलं असे होईल. आंदोलन करायला कुठंही जाऊन आंदोलन करता येतं. परत तुम्ही मलाच दोष द्याल, याला अक्कल नव्हती का? सहकार खाते राष्ट्रवादीकडे आहे. मी प्रश्न लवकर सोडवू शकतो, तेवढं कोणीही सोडवू शकत नाही. एक्साईज खातं माझ्याकडे आहे. मीच त्याच्या काही परवानगी असतील तर देऊ शकतो. हे सरकार पाच वर्षे चालणार आहे. असंही अजित पवारांनी म्हटले आहे.











