अॅड. सचिन वाघ, बारामती.
इरसाल लोकांनी भरलेली दुनिया अनेक पुस्तकात, सिनेमात पहायला मिळते, पण आपल्या सभोवतालीही अशी लोकं आहेत की, ज्यांचा प्रत्येकाचा रंग वेगळा, जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि तऱ्हा वेगळीच असते. अगदी आपल्या कल्पनेबाहेरची दुनिया असते या लोकांची! या प्रत्येकाची जगण्याची नशाच वेगळी असते. असाच काहीसा अतरंगी स्वभाव असणारे आमचे लिमटेकचे मारती नाना..! नाना आमच्या दोस्ताचा चुलता आहे बरं का?
अध्यात्माचा वारसा असणारं मारतीनानाचं घर गावातील प्रतिष्ठित तर आहेच, पण आमच्या लहानपणापासून जुना वाडा, केळी नारळाच्या बागा आणि मध्ये मोठ्ठ दत्त मंदिर! दर गुरुवारी आम्ही लहान मुलं आणि गावातील अनेक लोक इथं दत्तआरतीला जमायचो. सगळ्या भारावलेल्या आठवणी आहेत तिथल्या परिसराच्या!
इथं चार भावंडांच्या स्वतंत्र कुटूंब व्यवस्था एकाच वाड्याभोवती राहत. सगळा खूप मोठा गोतावळा होता. यात पहिल्यापासूनच कसलीही चिंता मारती नानानी केली नाही. असे निवांत, निष्काळजी लोक अनेक ठिकाणी असतात, पण आमचे नाना जरा हटके आहेत. सगळा संसार त्यांची पत्नी नानीने खांद्यावर घेऊन, सगळ्याची मर्जी सांभाळून केला.
नाना सकाळी अंघोळ करून डोक्यापासून दंड, पोट, सगळीकडे भस्माच्या पट्ट्या कपाळावर तीन चार प्रकारचे गंध लावून, कोपरीवर पांढरा शर्ट, पायजमा, टोपी घालून अगदी देव होऊन घराबाहेर पडतात अन् संध्याकाळी 12 ते 1 वाजता गाणी म्हणत वेगळीच मायावी व्यक्ती होऊनच घराकडे फिरतात. खूप सारे रेकॉर्ड नानाच्या नावावर आहेत.
मारती नाना एवढा पिक्चरचा चाहता मी अजूनही पाहिला नाही. दुपारी 12 वाजता थिएटरमध्ये गेलेला मारती नाना 12 ते 3, 3 ते 6, 6 ते 9, 9 ते 12 असे चारही शो बघून रात्री बारा लाच घरी यायचा. दरम्यानच्या काळात 20 ते 25 वडापावचा फडशा पाडलेला असायचा. अनेक वर्षे आमच्या मारती नानानी पहिला नाही, असा एकही पिक्चर बारामती च्या दुर्गा, तारा आणि काहीकाळ श्याम थेटरात न्हवता, शिवाय फलटण, अकलूज कधी कधी पुणेही नानाना लांब नसायचं.
शेवटी ही थेटरं बंद पडली, पण नानाचा नाद काही जरासुद्धा कमी झाला नाही. अनेक वेगवेगळे व्ययसाय करण्याचा प्रयत्न नानांनी केला, परंतू त्याला यश काही आलं नाही. त्यामुळे चांगला व्यवसाय सापडेपर्यंत व्यवसाय करायचा नाही अशी भीष्म प्रतीज्ञा करून नानांनी आपल पिक्चर बघणं चालूच ठेवलं. बारामती मधील श्याम, दुर्गा, तारा, माळेगावचं मधवानंद, सोमेश्वरचं नवनाथ, अकलूजच श्रीराम, फलटणचं नामवैभव या सगळ्या थेटरांच्या अनेक खुर्च्या नानांनी अनेक वेळा गरम केल्या आहेत.
एकदा असं झालं की.. माळकरी घराणं असल्यानं नेहमी पंढरपूरला नानाच्या घरातील कोणी ना कोणी जात असायचं, परंतु ह्यावेळी सगळी मंडळी रानात व्यस्त असल्याने पंढरपूरची वारी करण्याचा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा नानांना पाचारण करण्यात आलं. नानांनी ती जबाबदारी व्यवस्थित खांद्यावर घेऊन सकाळीच पंढरपूर STधरली. पण ST अकलूजला आल्यावर नानाला पिक्चरचं पोस्टर दिसलं.
नानाला त्यातच पांडुरंग दिसला. नाना तिथच उतरला. तिन्ही शो बघून बाहेर आला. आत्ता घरी गेल्यावर काय सांगायचं? प्रश्न आला. नानांनी तिथंच दुकानात बुक्का, लाह्या, बतासे घेतले. पुडी फोडून कपाळाला बुक्का लावला. घरी आले. घरच्यांनी मनोभावे नानाचे दर्शन घेतले. नानांनी त्यांना बुक्का लावला अन् लाह्या बताष्याचा प्रसाद खाल्ला. अशा पुढं अनेक वाऱ्या नानांनी हसत हसत केल्या,
नाना पिक्चर पाहतो हे आख्या गावाला माहीत आहे . त्यामुळे आमच्या गावातील नित्या, नानाच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर बसायचा, अन् नाना त्याला पिक्चरला जोडीदार म्हणून न्यायचे. नित्याला पण भारी वाटायचं. फुकट पिक्चर, फुकट नाष्टा पण नानाच्या लक्षात नित्याच सोकावलेपण आलं. एकदा असच फलटणला नानाला चिकटून नित्या पिक्चर ला गेला. पिक्चर संपल्यावर नाना नीत्याला घेऊन एका हॉटेल मध्ये गेला.
दोघांनी भरपूर ऑर्डर सांगितली. नित्या ताव मारत होता, तोवर नानांनी हात धुतला. लूनाला किक मारली अन् थेट लिमटेक गाठलं. नित्या जोरदार जेवून हिकडंतिकडं बघतोय, तर कोणाचं नाय. मग काय, हॉटेल मालकानं नित्याला कोंडला. हिकडं गावात नित्या दिसत नाय, म्हणून आई हुडकायला लागली, तेव्हा कळलं की, नित्या फलटणलाच राह्यलाय.
दोन दिवसांनी गावातल्या लोकांनी जाऊन हॉटेल वाल्याचा हिशोब चुकता करून नित्याला घरी घेऊन आली. हळूहळू काळ बदलला. नेटवर्क मार्केटिंगच वार आलं होतं. कुणीतरी नानांना सांगितलं, एकदा पैसे लावायचे मग आपोआपच पैसे येत राहतात. नानाच उसाच बिल आलं होतं 2 लाख रुपये!
नानांनी स्वतःचे पैसे भरले आणि खाली नेटवर्क जुळवायला घरातून बाहेर पडले, पहिल्या पाहुण्याकडे गेल्यावर तो म्हणाला सगळं पटतय पण पैसे नाहीत सध्या. नाना म्हणाले, मी भरतो नंतर आल्यावर द्या. मग दुसरा पाहुणा , मित्र शोधत शोधत नानां लिमटेक वरून लुनावर डायरेक्ट परभणीत निघाले, तोपर्यत नानांचे पदरचे 2 लाख संपले होते.
कंपनीचे लोक म्हणाले आपल्याला गोव्याला जायचय …नाना पायजमा, शर्ट, टोपी घालून विमानाने गोव्याला गेले मजा करायला. (येताना ट्रकने यावं लागलं तरी नाना घाबरत नाही) जसं गरज ही शोधाची जननी असते, तसे नाना आपल्या गरजा भागवायला पैशांचा काही तरी शोध लावतातच.
एवढा सगळा संसार चालू असतानाच नानाला गजब शोध लागला. काही लोकाना जादूटोणा उतरवायला कडु इंद्रायन (टरबूजासारखे कडू फळ) नावाचं फळ लागतं असं नानांनी ऐकलं. (कडू वृंदावन, इंद्रफळ, गु. इंद्रक, तुमटीकाई, चित्रफला, महेंद्रवारुणी, बिटर अॅपल, कोलोसिंथ ) मग नानांनी कडू इंद्रायन विकायचा धंदा सुरू केला. धंद्याला चांगले दिवस आले. भटके, धनगर, गुराखी यांचं जाळं नानानी निर्माण केलंय आणि त्यांच्याकडून गोळा झालेली ही फळ पुढं विकायला नाना लुनावर लांब लांब प्रवास करतात.
मग नानाने कडू इंद्रायनची शेतीच केली, महाराष्ट्रत कडू इंद्रायन ची शेती करनारा हा एकमेव माणूस आहे. मुलींची लग्न कशी झाली? मुलांनी घर बांधली, गोठा मोठा केला, नातवंडे आली, शेती सुधारली,परिस्थिती सुधारली, कुटुंबात चढउतार आले, पण नानांना कुणीही डिस्टर्ब करू शकलं नाही. आजही नानांची स्वतःची वेगळी दुनिया आहे. त्यांना कोणी शत्रू नाही, दुश्मन नाही , त्यांना काहीही व्यर्ज नाही. आयुष्याचा आनंद घेणं हा त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे हे आमचे मारती नाना रोज सिद्ध करतात.











