दौंडमध्ये शेतकरी आक्रोश मोर्चाचे स्वागत !
राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : केंद्रात आणि राज्याचे भाजप सरकार हे पूर्णपणे शेतकरी विरोधी धोरण राबवित आहे. कंपन्यांना आणि उद्योजकांना भरमसाठ कर्ज देऊन त्यांचे कर्ज माफ करणारे हे सरकार म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी आहे. असा हल्लाबोल खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेतकरी आक्रोश मोर्चाचे आगमन शुक्रवारी (दि २९) दौंड तालुक्यात झाले. दौंड शहरातील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत हा मोर्चा महात्मा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, संविधान चौकात येऊन धडकला. शेतकऱ्यांचा हा आक्रोश मोर्चा तालुक्यातील कुरकुंभ, मळद, खडकी मार्गे इंदापूर तालुक्यात मार्गस्थ झाला.
यावेळी या मोर्चात बोलताना बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यातील शेतकऱ्यांचे हाल पाहून खासदार अमोल कोल्हे आणि मी मागील काही महिन्यापासून अस्वस्थ आहे. शेतकरी संपवा, कंपन्या जगवा! अशी भूमिका या भाजप सरकारची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न या भ्रष्ट जुमला सरकार पर्यंत पोहोचण्यासाठी हा मोर्चा काढला आहे.
महाराष्ट्रात केंद्र व राज्य सरकारकडून शेतकरी विरोधी धोरण राबवले जात आहे. बी-बियाणे खतांच्या किंमती भरमसाठ वाढवल्या आहेत, वीजदरवाढ व कांदा निर्यातबंदी केली, हमीभाव दिला जात नाही, या सरकारचा कहर म्हणजे शेतमालाची सरकारी खरेदी बंद करत आहे. या वर्षात तब्बल २०६६ शेतक-यांनी आत्महत्या करून जीवन संपवले आहे. दूध उत्पादक शेतकरी वैतागला आहे.
मराठवाडा विदर्भ या भागातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे संपुष्टात आला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय या सरकारने घेतला नाही. असा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच कांदा निर्यात बंदी तत्काळ उठवावी तसेच कांदा निर्यातीसाठी कायम स्वरूपी धोरण ठरवावे, खासगी व शासकीय असा भेद न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे.
शेतीसाठी दिवसा अखंडित वीज पुरवठा करावा, पीकविमा कंपन्यांच्या मनमानीला आळा घालून नुकसान भरपाई तातडीने मिळावी.शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी. अशा विविध मागण्या आणि प्रश्न मांडत हा शेतकरी आकाश मोर्चातून मांडण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, राष्ट्रवादीचे नेते रामभाऊ टुले, सोहेलभाई खान, राष्ट्रवादी युवा आघाडीचे अजित शितोळे, सचिन काळभोर तसेच महिला आणि शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.











