युवराज जाधव : महान्यूज लाईव्ह
आज सांगली दौऱ्यात अजित पवार यांनी भिलवडी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. कवलापूर येथील निवारा केंद्राचीही पाहणी केली. त्याचबरोबर अजूनही मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने भिलवडी येथे उपमुख्यमंत्र्यांनी बोटीतून नुकसानीची पाहणी केली.
भिलवडी (ता. पलूस, जि. सांगली) येथील बाजारपेठ पुर्णपणे पाण्याखाली आहे, पाणी भरलेल्या बाजारपेठेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोटीतून जाऊन पाहणी केली. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम आदी सहभागी होते.
भिलवडी (ता. पलूस, जि. सांगली) येथील पुरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पुरग्रस्तांना ठेवण्यात आलेल्या निवारा केंद्राला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन पुरग्रस्तांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. पुरग्रस्तांच्या राहण्याची, जेवण्याची सोय कशी आहे ? याची त्यांच्याकडून माहिती घेतली.
भिलवडी परिसरातील ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना वारंवार पुराचा फटका बसतो अशा घरांचा सर्व्हे करा. वारंवार पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंचावरील जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. भिलवडी गावातील पुरग्रस्तांच्या व्यथा ऐकल्यानंतर त्यांच्या पुनर्वसन आणि मदतीसाठी चांगला मार्ग काढण्याचे आश्वासन देत संकटाच्या काळात राज्य सरकार प्रत्येक नागरीकाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
सांगली शहरातील स्टेशन चौक परिसरालाही उपमुख्यमंत्र्यांनी भेट दिली. स्टेशन चौक परिसरातील स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगली शहराला वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीवर कायमस्वरुपी उपाय योजना राबविण्याबाबत चर्चा केली. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सांगलीच्या कवलापूर येथे पंडित नेहरू विद्यालय आणि दामाणी विद्यालय येथील पूरग्रस्त निवारा केंद्रांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली. तेथील पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेतल्या. वारंवार पुराने बाधित होणाऱ्या पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.











