अन्यायकारक निर्णय मागे घेण्याचे सरकारचे आश्वासन; परिषद पदाधिकारी व मंत्री मंडळाच्या बैठकीत सकारात्मक तोडगा
दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
राज्यातील बहुतेक ग्रामपंचायतींच्या पथदिवे व पाणीपुरवठा जोडांचे तोडण्यात आलेले कनेक्शन व ऐन कोरोनाच्या काळातील या निर्णयामुळे गावांवरील आलेले संकट आज सरपंच परीषदेच्या शिष्टाईमुळे दूर झाले. सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या वतीने आज(दि.२०) मंत्रालय येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उर्जामंत्री नितीन राऊत , सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईटची तोडलेली कनेक्शन व पाणीपुरवठा कनेक्शन पुर्ववत जोडण्याचा निर्णय घेण्यात आला, तसे आदेश सबंधित विभागाला तात्काळ देण्यात आले.
यामुळे सरपंच परिषदेच्या राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला भरीव यश मिळाल्याचा दावा परीषदेच्या वतीने करण्यात आला. सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय काकडे, प्रदेश सरचिटणीस ऍड विकास जाधव, सातारा जिल्हा सरपंच परिषदेचे अध्यक्ष नितीन पाटील सरपंच परिषदेचे विश्वस्त व सातारा कार्याध्यक्ष आनंदराव जाधव ,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष समाधान पोफळे, पश्चिम महाराष्ट्र सचिव संजय शेलार, सातारा जिल्हा उपाध्यक्ष अरुण कापसे, जिल्हा सचिव शत्रुघ्न धनवडे व इतरही पदाधिकाऱ्यांचे सरपंच परिषदेचे महाराष्ट्राचे शिष्टमंडळ आज वरील मंत्र्यांना भेटले.
मागील काही महिन्यापासून महावितरणने राज्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या सार्वजनीक स्ट्रीटलाईट व पाणी पुरवठा करणाऱ्या वीजपंपाचे कनेक्शन तोडले होते. यामुळे सरपंच परिषद राज्यात आक्रमक झाली होती. सरपंच परिषदेने राज्यात निदर्शने सुरू केली होती. तसेच या निर्णयामुळे भर पावसाच्या दिवसात अनेक ग्रामपंचायती अंधारात व लाखो नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागले आहे. यामुळे राज्य शासनावर नागरिकांचाही रोष वाढू लागला होता.
मंत्री महोदयांच्या निर्णयांचे स्वागत , दत्ता काकडे,प्रदेश अध्यक्ष, सरपंच परिषद : सरपंच परिषद मुंबई,महाराष्ट्राच्या शिष्टमंडळा बाबत सबंधित विभागाने सकारात्मक चर्चा व निर्णय घेऊन सर्व तोडलेले कनेक्शन पुर्ववत करण्याचे आदेश दिल्या बद्दल सरपंच परिषद सर्वांचे मनपुर्वक आभार मानत आहे.तसेच सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळात सहभागी असलेले सरपंच परिषद मुंबई सातारा जिल्हा अध्यक्ष नितीन पाटील व त्यांच्या टीम मधील सर्व पदाधिकारी वर्गांचे देखील कौतुक करावे तेवढे थोडे आहे.
हा तर सरपंचाच्या एकजुटीचा विजय; अॅड.विकास जाधव, प्रदेश सरचिटणीस, सरपंच परिषद : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ, उर्जा विभागाचे मंत्री नितीन राऊत, सहकार विभागाचे मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळा सोबत सकारात्मक चर्चा व घेतलेले निर्णय आणि दिलेले आदेश म्हणजे राज्यातील सरपंच वर्गाच्या एकजुटीचा व सरपंच परिषदेच्या आंदोलनाचा विजय आहे.
राज्य शासनाने सहकार्याची भुमिका घेतली : नितीन पाटील, जिल्हाध्यक्ष, सरपंच परिषद,सातारा. सर्व मंत्री महोदयांनी सरपंच परिषदेच्या मागण्या व ग्रामपंचायतीच्या अडचणी ऐकून दिलेले आदेश महत्वपुर्ण आहेत. यामुळे पुन्हा अनेक गावात वीज पुर्ववत होऊन मोठी समस्या मिटणार आहे.तसेच या पुढे देखील राज्य सरकार सरपंच परिषद व सरपंचाच्या हितासाठी कटीबद्ध व सकारात्मक असे आश्वासन दिले आहे.










