खंडाळा : महान्यूज लाईव्ह
पूर्वीच्या प्रेमसंबंधातून युवक विवाहित असल्याने विवाहास का नकार दिला याचा जाब विचारीत २५ वर्षीय युवतीचे कारमधून जबरदस्तीने मारहाण करीत अपहरण करणाऱ्या जालना जिल्ह्यातील दोन युवकांना शिरवळ पोलीसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. याप्रकरणी शिरवळ पोलीसांनी कारसह तुषार भारतसिंग परदेशी ( वय २८) व आशिष परमेश्वर काळबांडे (वय २२) या दोघं अपहरणकर्त्यांना अटक केली आहे.
याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, जालना जिल्ह्यातील संबंधित युवतीचे पूर्वी ८ वर्षांपूर्वी जालना जिल्ह्यातील तुषार परदेशी या युवकाबरोबर प्रेमसंबंध जुळले होते, मात्र युवतीबरोबर लग्न करण्यास नकार दिल्याने तुषार परदेशी याच्याबरोबरचे प्रेमसंबंध युवतीने तोडून टाकले होते.
यावेळी तुषारने संबंध तुटल्यानंतर पुन्हा युवतीला लग्नाची मागणी घातली, मात्र युवतीने लग्न करण्यास नकार दिला होता. यानंतर तुषारने दुसऱ्या मुलीबरोबर लग्न केले. त्यानंतर तुषार परदेशी हा जानेवारी २०२१ पासून सतत या युवतीस दूरध्वनीद्वारे त्रास देत होता.
दरम्यान,शुक्रवार २ जुलै रोजी संबंधित युवती ही नेहमीप्रमाणे कंपनीमध्ये कामावर जाणेकरीता शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या एका पतसंस्थेसमोर आली असता कार (क्र.एमएच-४३-एबी-२३४९) मधून तुषार परदेशी व कारचालक आशिष परमेश्वर काळबांडे हे त्याठिकाणी आले.
यावेळी कारमधून तुषार परदेशी हा उतरल्यानंतर युवती ही महामार्गाच्या दिशेने पळत सुटली, तुषार परदेशी याने युवतीचा पाठलाग करीत युवतीला कारमध्ये जबरदस्तीने बसविण्याचा प्रयत्न केला. युवतीने प्रतिकार केला असता तुषार परदेशी याने युवतीला मारहाण करीत जबरदस्तीने कारच्या पाठीमागील सिटवर बसवीत कार सातारा बाजूकडे महामार्गावरून पळविली.
यावेळी याबाबतची घटनास्थळावरून माहिती तत्काळ शिरवळ पोलीस स्टेशनला मिळताच शिरवळ पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू अहिरराव, पोलीस हवालदार किशोर नलावडे, प्रशांत वाघमारे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, युवतीचा आरडाओरडा ऐकून सातारा बाजुकडून पुणे बाजूकडे निघालेल्या दुचाकीवरील एका जोडप्याने कारचा पाठलाग करीत कारला दुचाकी आडवी मारली. त्यामुळे संबंधितांनी कार थांबवली.
यावेळी शिरवळ पोलीसांनी व उपस्थित नागरिकांनी घटनास्थळावरून पलायन करणाऱ्या प्रेमवीर तुषार परदेशी व चालक आशिष काळबांडे यांच्या अपहरणासाठी वापरलेल्या कारसह अवघ्या १० मिनिटांमध्ये मुसक्या आवळत युवतीची सुटका केल्याने सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेची विनयभंग व अपहरणची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई या करीत आहेत.