शिरूर : महान्युज लाईव्ह
शिरूर तालुक्यातील शेतीपंपाचा महावितरणने खंडित केलेला विद्युतपुरवठा त्वरित सुरळीत न केल्यास आठ दिवसात महावितरण कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिरूर तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी दिला आहे.
याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की,गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट होते. या संकटात शेतीमालाला बाजारभाव नाही.लॉकडाऊन काळात तरकारी पिके, फळे, आदी बाजारात विक्रीसाठी न नेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी अक्षरशः कर्ज बाजारी झाला आहे. त्यात कोरोनाच्या महामारीत कुटुंब वाचविताना सावकाराच्या दारात उभे राहून पैसे घेऊन दवाखान्याला उपचारासाठी खर्च करावा लागला आहे. उसाचे पैसे शेतकऱ्याला अजून मिळणे बाकी आहे. या सर्व परिस्थितीत शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे.
त्यातच महावितरण अक्षरशः सावकाराप्रमाणे वसुलीसाठी शेतकऱ्याच्या मागे लागला आहे. शेतकऱ्यांकडे द्यायला पैसेच नाही. तर दुसरा अन् तिसरा हप्ता भरणार कुठून असा सवाल यावेळी त्यांनी व्यक्त केला असून येत्या आठ दिवसांत महावितरणने सक्तीची वीजबिल वसुली थांबवून खंडित केलेला वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर आठ दिवसात महावितरण कार्यालयासमोर सर्व शेतकरी बांधवांना घेऊन तीव्र स्वरूपाचे ठिय्या आंदोलन केले जाणार असल्याचे दादा पाटील फराटे यांनी सांगितले आहे.











