महान्यूज लाईव्ह रिपोर्ट
पुणे जिल्हा हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि अत्यंत घनिष्ठ मित्र असलेल्या शिवाजीराव अण्णा भोसले यांचे निधन झाल्याची माहिती मिळताच ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सौ प्रतिभाताई पवार आज थेट वाणेवाडी येथे पोहोचले. हेलिकॉप्टरने आलेल्या पवार यांनी भोसले कुटुंबीयांचे सांत्वन केले, मात्र अत्यंत जवळचा सहकारी गमावल्याचे दुःख पवार यांच्या चेहऱ्यावर दिसत होते…!
याचा व्हिडीओ येथे पहा अथवा महान्यूज लाईव्ह फेसबुक पेज वर पाहू शकता
18 ऑक्टोबर रोजी शिवाजीअण्णा यांच्या पत्नी विमल यांचे निधन झाले होते, त्या दिवशीच श्री. पवार हे भोसले यांना भेटण्यासाठी निघाले होते, मात्र शिवाजीअण्णा यांचीही तब्येत बिघडल्याचे समजल्यानंतर त्यांनी इकडे येण्याचा बेत रद्द केला. तोपर्यंत शिवाजीअण्णांना दवाखान्यात हलवण्यात आले होते, त्या दिवशी भेट झाली असती मात्र ती भेट होऊ शकली नाही असे सांगत पवार यांनी हळहळ व्यक्त केली. वाणेवाडी येथे भेट दिल्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा देताना श्री पवार यांनी आमच्या वेळचे रघुनाथ भोसले, के. वाय. जगताप, बी.जी.काकडे एवढेच त्याकाळचे मित्र आता सोबतीला असल्याचे सांगितले. यानंतर पवार हे सावंतवाडीकडे रवाना झाले.
कोण होते, शिवाजीअण्णा भोसले? शरद पवार यांच्यासोबत किती घनिष्ठ होती मैत्री?
शिवाजीआण्णा भोसले हे तसं आडदांड व्यक्तिमत्व. मनात असेल ते समोरासमोर बोलण्याची धमक असलेला. मनात असेल तसे वागण्याची आणि त्याचे परिणाम निर्भीडपणे भोगण्याची तयारी असलेला. पण बैठक समाजपरिवर्तन करू इच्छिणार्या कार्यकर्त्याची. पुण्यात शाळेत शिकत असताना आवर्जून राजकीय सभा ऐकायला जात. ना. ग. गोरे, एस. एम. जोशी यांची भाषणे त्यावेळी त्यांनी ऐकलेली. त्यानंतर ते आपल्या गावी म्हणजे सोमेश्वरजवळील वाणेवाडीत आले. पवारसाहेबांनी बारामती तालुक्यात युवक काँग्रेसची पक्षबांधणी करताना जे कार्यकर्ते जोडून घेतले, त्यामध्ये प्रमुख नाव शिवाजीआण्णांचे.
१९६२ सालच्या सुमारास शरद पवार वाणेवाडीत आले असताना त्यांची भेट झाली. युवक काँग्रेसचे काम करण्याबाबत शरद पवारांनी त्यांना विचारले. तेव्हापासून शरद पवारांशी दोस्ती झाली. जवळ जवळ एकाच वयाचे असल्याने आण्णा शरद पवारांना नावानेच हाक मारत. एका मोटारसायकलवरून फिरत असत. अनेकदा एसटीनेही एकत्र प्रवास करीत. शरद पवार मंत्री झाल्यावर त्यांनी साहेब नावाने बोलावायला सुरुवात केली.
शिवाजीआण्णांच्या राजकीय जडणघडणीत शरद पवारांपेक्षाही जास्त वाटा राहिला तो शारदाबाई पवारांचा. शरद पवारांच्या आईंचा. विधानसभा तसेच लोकसभेच्या निवडणुकीत शारदाबाई प्रचारासाठी येत. काकडे गटाच्या वर्चस्वाखालील या परिसरात प्रचारासाठी स्थानिक लोक पुढे येत नसत. त्यावेळी शारदाबाई आण्णांबरोबर गावागावात फिरल्या आहेत. शिवाजीआण्णा ७२ साली जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतरही अनेकदा आठवडा-पंधरा दिवसांतून शारदाबाई आण्णांना बरोबर घेऊन वेगवेगळ्या गावांना भेटी देत असत. तेथील प्रमुख कार्यकर्त्यांशी ओळखी करून देत. कोण कसा आहे, कुणाशी कसे वागायचे याच्या कानगोष्टी सांगत. माणसे पारखण्याचे जे कसब शरद पवारांमध्ये आहे ते मूळ असे शारदाबाईंकडून आलेले आहे. पवारसाहेबांचे मोठे बंधू आप्पासाहेब पवार यांच्याशीही शिवाजीआण्णांची मैत्री होती. अकलूजच्या कारखान्यावर एमडी म्हणून आप्पासाहेब काम करीत होते, तेव्हापासून ते एकमेकांना ओळखत होते. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या उभारणीसाठी त्यांनी घेतलेले कष्ट शिवाजीआण्णांनी जवळून पाहिलेले होते. यामुळेच शिवाजीआण्णांच्या मुलीच्या लग्नात आप्पासाहेब त्यांच्यासोबत दोनतीन तास पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी उभे होते.
जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीची ऐतिहासिक १९६७ ची विधानसभा निवडणूक. शरद पवारांना तिकीट देऊ नये यासाठी तालुक्यातील व तालुक्याबाहेरील मातब्बर मंडळी यशवंतराव चव्हाणांना भेटायला गेली होती. तिकीट शरद पवारांनाच द्या, असे सांगण्यासाठी जे लोक यशवंतराव चव्हाणांकडे गेले त्यात शिवाजीआण्णा होते. बहुतेक सगळे तरुण लोक. यशवंतराव शिवाजीआण्णांकडे पाहून म्हणाले, अरे, तुला अजून मिसरूड फुटले नाही, तू काय शरदला निवडून आणणार? त्यावेळी शिवाजीआण्णा आत्मविश्वासाने म्हणाले होते, तिकीट द्या, १०१ टक्के निवडून आणणार.
त्यानंतर शरद पवारांचे तिकीट नक्की झाले. त्यावेळीही शरद पवारांना शंका वाटत होती की, काकडे गटाचे वर्चस्व असलेल्या निंबूत, वाणेवाडी, मुरूम या गावांतून आपल्याला मते मिळतील की नाही? त्यांनी शिवाजीआण्णांना सांगितले होते की, या गटातून माझ्यामध्ये व विरोधी उमेदवारात १००० ते १५०० पेक्षा जास्त फरक राहणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. हा फरक मी इतर भागातून भरून काढतो. शरद पवारांचे या भागात कार्यकर्ते मोजकेचे होते, पण जिवाला जीव देणारे होते. त्यांनी या परिसरातून १६०० पेक्षा जास्त लीड मिळवून दिले. असाच एकदा ७९ सालच्या पंचायत समिती निवडणुकीत पवारसाहेबांच्या शब्दाखातर शिवाजीआण्णांनी भरलेला फॉर्म माघारी घेतला.
राजकीय परिवर्तन झाले तरी सहकारातील संघर्ष सुरूच राहिला. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना काकडे गटाच्या ताब्यात होता. शिवाजीआण्णांनी ८१ सालात पवारसाहेबांच्या सल्ल्याने मुगुटराव काकडे यांच्याबरोबर एकत्रित पॅनल करून निवडणूक लढविण्याचे ठरविले. निवडणुकीसाठी फॉर्मही भरले. ज्यादिवशी छाननी झाली, त्याच रात्री मुगुटराव काकडेंचे निधन झाले. हा खूपच मोठा धक्का होता. या परिस्थितीत निवडणूक लढवावी की नाही याबाबत कार्यकर्त्यांमध्ये मतभेद झाले. शिवाजीआण्णांचा स्वभाव पुढे टाकलेले पाऊल मागे घेण्याचा नव्हताच. त्यांनी निवडणूक लढविण्याचे ठरवले. या निवडणुकीत त्यांना शरद पवारांची अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यामुळे ते शरद पवारांवर रागावले. पुढची दोन वर्षे ते शरद पवारांना भेटलेही नाहीत. मात्र शरद पवारांनी त्यांना कधीच परके मानले नाही. जिथे संधी मिळाली तिथे त्यांना समजावण्याचा, पुन्हा आपलेसे करून घेण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. शिवाजीआण्णांच्या घरातील एका लग्नाची पत्रिका त्यांना पोस्टाने पाठवण्यात आली. त्या लग्नालाही ते आवर्जून उपस्थित राहिले. त्यानंतरही शिवाजीआण्णांचा राग गेला नव्हता. अखेरीस चंद्ररावआण्णांनी वेगळे कारण सांगून शिवाजीआण्णांना सांगवीतील त्यांच्या घरी बोलावले. पवारसाहेबही तिथे आले. शिवाजीआण्णांची समजूत काढली. पुन्हा ९२ सालातील सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवारांच्या नेतृत्वाखाली शिवाजीआण्णांनी काम केले. शरद पवारांसाठी त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता लाखमोलाचा होता.










