आज शिवशंभु काळात काय घडलं?
(महान्यूजच्या वाचकांसाठी : स्वराज्याची रणरागिनी ग्रुप महाराष्ट्र यांच्या वतीने आज पासून दररोज शिव-शंभुकाळात नेमके याच दिवशी काय घडले होते याची ऐतिहासिक माहिती दररोज प्रसिद्ध केली जाणार आहे)
२९ ऑक्टोबर इ.स.१५०१
व्हास्कु द गामा कालिकत येथे दाखल झाला. अरब व्यापारांच्या हाती असलेल्या मसाल्याचा व्यापार हिसकावून घेतला पाहिजे, असे पोर्तुगीजांना खूप दिवसांपासुन वाटत होते. त्या धोरणास अनुसरून राजा दो मानुएल याने हिंदुस्थानला तिसरे आरमार पाठविण्याची तयारी करण्याचे फर्मान दिले. या मोहिमेचे नेतृत्व काब्रालच्या हाती सुपूर्द करण्याचा त्यांचा मनोदय होता. परंतु तो बदलून त्याने त्या मोहिमेवर व्हास्को द गामा याला पुन्हा पाठवण्याचे ठरवले. तिसऱ्या मोहिमेची सर्व तयारी झाल्यावर व्हास्को द गामाने आपल्या आरमारी तांड्यासह पोर्तुगाल सोडले. २९ ऑक्टोबर १५०१ कालिकतला येऊन दाखल झाला. वाटेत त्याने मक्केची यात्रा करुन हिंदुस्थानला परतणाऱ्या मुसलमान यात्रेकरुचा भयंकर छळ केल्याने क्रुरकर्मा म्हणुन त्याचे इतिहासात नाव झाले. त्याच्या बरोबरच पोर्तुगीज नावाडी हे जंगली म्हणुन हिंदुस्थानात ते ओळखले जाऊ लागले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदर येथे फतेखानाचा पराभव केला..!!
२९ ऑक्टोबर १६४९
शके १५५० मध्ये पुरंदर आदिलशाहीत आला. इ.स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. त्याच वेळी शिवाजीमहाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले. परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत, तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते. महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. महादजी नीलकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता. त्यांच्या भावाभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले. या पुरंदर किल्ल्याच्या साहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले.
मुधोळची बातमी घेऊन जासूद राजगडी रवाना!
२९ ऑक्टोबर इ.स.१६६४ (कार्तिक वद्य पंचमी शके १५८६ संवत्सर क्रोधी वार शनिवार)
महाराजांनी बाजी घोरपडेचा निकाल लावून पुरे मुधोळ लुटल्याची बातमी घेऊन जासूद किल्ले राजगडी रवाना झाला. राजे शहाजीराजे यांना झोपेत पकडण्यास पुढाकार घेतलेले अफजलखान आणि बाजी घोरपडे या दोघांनाही शिवरायांनीच संपवून राजे शहाजीराजे यांच्या त्या अपमानाचा अखेर बदला घेतला. ही बातमी माँ साहेब जिजाऊ साहेबांपर्यंत देण्यासाठी जासूद किल्ले राजगडी रवाना झाला!
शंभूराजेंच्या हुकुमानुसार नामी आसामी कैद!
२९ ऑक्टोबर इ.स.१६८४
(कार्तिक शुद्ध २ प्रतिपदा शके १६०६ रक्ताक्ष संवत्सर वार बुधवार)
छत्रपती संभाजी महाराजांना जीवे मारण्याचा कट केल्याच्या आरोपावरून छत्रपती संभाजी महाराजांच्या हुकुमानुसार मानाजी मोरे, वासुदेवपंत, गंगाधरपंत व राहुजी सोमनाथ या नामी आसामींना कैद करण्यात आले.
खडकीची लढाई
२९ ऑक्टोबर इ.स.१८१७
२९ ऑक्टोबरला हल्ला न करून मराठ्यांनी विजयाची सुवर्ण संधी दवडली…
२८ ची रात्र एलफिस्टनने जागून काढली . ग्रँड डफ त्याच्या बरोबर होता. हल्ला न झाल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असणार यात शंका नाही. २९ ऑक्टोबरला एलफिस्टनने पेशव्यास निरोप पाठवला की गारपिरवर मराठा फौज त्याच्या फौजेच्या अगदी हद्दीवर आहेत त्या काढून घ्याव्या. पण पेशव्याने काही एक हालचाल केली नाही. तेव्हा युद्ध अटळ आहे हे एलफिस्टन समजून चुकला.
अधिक माहिती संपर्क :- राजदादा तपसे 9145806202 (आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची) @संकलन :- राहुल बोरसे पाटील











