बारामती : माळेगाव कारखाना चालविणारे भाजपने जेव्हा पाणी बंद केले, तेव्हा का गप्प बसले? सभासदांनी निळकंठेश्वर पॅनेल निवडून द्यावे, पाच वर्षे चांगला दर देण्याची जबाबदारी माझी राहील. निवडणूक झाल्यावर विस्तारीकरणाची चौकशी राज्य सरकारमार्फत केली जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निरावागज येथे सांगितले.
निळकंठेश्वर पॅनेलच्या प्रचाराच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज निरावागज, सांगवी, पणदरे येथे सभा घेतल्या. यावेळी पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कारखान्याचे संचालकपदाचे उमेदवार उपस्थित होते.
पवार म्हणाले, निरा डाव्या कालव्याच्या पाण्याचा निर्णय जर मी घेतला नसता, तर उन्हाळ्यात धूळधाण झाली असती, सत्कारावेळीच मी सारे काही योग्य करेन असे म्हटले होते, त्या पध्दतीने केले. अर्थात फलटण, पंढरपूर, माळशिरस, सांगोला कोणत्याही तालुक्यावर अन्याय केलेला नाही. आम्ही समन्यायी निर्णय घेतला. सूत्रे असताना शेजारधर्मही पाळायचा असतो. सर्वांना सारखा न्याय द्यायचा असतो. आता जे कारखाना चालवतात, त्यांनी तुमचे पाणी बंद केले होते. निरा डाव्या कालव्याचे पाणी काढून घेतले, तरी यांच्या तोंडून ब्र निघाला नाही. ते का बोलले नाहीत. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडे गेले नाहीत. भाजपवाल्यांना हार हेच घालत होते. तेच पाणी भाजपवाल्यांनी बंद केले, तेव्हा का बोलला नाहीत? राष्ट्रवादी काँग्रेस हा महाआघाडीत असल्याने हा निर्णय आपण घेऊ शकलो. अर्थात या निर्णयातून त्यांनाही पाणी मिळणार आहे. जर वितरीका सुटल्या नाहीत, तर आज कोणाच्या विहीरीत पाणी आहे काय? भाजपवाल्यांच्या कल्पना होत्या की, बंद पाईपने पाणी आणायचे, बंद पाईपने पाणी आणले, तर पाणीच कोठेही पाझरणार नाही. असले विचार यांचे आहेत. त्यामुळे तुम्ही माळेगाव ताब्यात द्या, जिथे चुका झाल्या आहेत, त्या दुरुस्त करू. ज्यूस, सिरप वाहून जाणार नाही याची काळजी घेतली जाईल. माळेगावचे विस्तारीकरण झाले, मग कारखाना फक्त 7 हजारांनीच का चालतो? माळेगावचा सरासरी 10.49 टक्के सरासरी उतारा व सोमेश्वरचा साखर उतारा 11.43 टक्के आहे. माळेगावात एका टनामागे 10 किलो साखर कमी मिळते. चंद्रराव अण्णा व रंजन तावरे यांनी हे लक्षात घ्यावे की, साखरेचा 9 किलोचा फरक असेल तर जवळपास एका टन उसालाच 270 रुपयांचा फटका बसतो. अण्णांनी व रंजन पाटलांनी कितीही सांगावे, पण सगळी सोंगे करता येतात, पैशाचे सोंग करता येत नाही.
माळेगावचा कारभार चुकीचा चालला आहे. माझे या कारखान्यावर कांडके जात नाही. मात्र माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे, त्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझे काम आहे की, चुकीचे होत असेल तर सांगितले पाहिजे. सहवीजनिर्मिती व डिस्टीलरीत काय चाललेय हे सांगायची गरजच नाही. माळेगावमध्ये ज्या सहकारी संचालकांना अपात्र करवले, त्यांची चौकशी राज्य सरकारमार्फत लावणार आहे. माझी चौकशी लावली, आम्ही कधी विरोधी पक्षात होतो, म्हणून म्हटलो नाही. आम्हीपण खरेदीची चौकशी लावणार आहोत. विस्तारवाढ कशी झाली याचीही चौकशी आम्ही लावणार आहोत.
पुरूषोत्तम जगताप म्हणाले, माळेगावने दिलेला दर हा फसवा आहे. सोमेश्वरने जाहीर केल्यानंतर हा दर जाहीर केला. सोमेश्र्वरने 20 कोटींचा राखीव निधी ठेवून आपला दर जाहीर केला. मात्र माळेगावचा दर निवडणूकीसाठी दिल्याचे दिसून येते. माळेगावचा साखर उतारा हा सोमेश्वरपेक्षा अधिक असायला हवा होता. कारण सोमेश्वरमध्ये 90 टक्के ऊस हा फुले 265 जातीचा असतो. मात्र तरीदेखील माळेगावचा साखर उतारा कमी का याचा विचार करायला हवा. सोमेश्वरची डिस्टीलरी 30 हजार लिटर प्रतिदिन उत्पादन क्षमतेची असूनही माळेगावच्या 60 हजार लिटर क्षमतेच्या डिस्टीलरीएवढे उत्पन्न मिळवते, मग गणित कोठे बिघडते असा प्रश्न पडतो.
माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनीही विद्यमान सत्ताधार्यांच्या कारभारावर कडाडून टिका केली. सभासदांच्या हिताची जपणून न करता या सत्ताधार्यांनी स्वत:चा स्वार्थच अधिक पाहिल्याचे त्यांनी सांगितले. मिथुन आटोळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या विविध पदाधिकार्यांची यावेळी भाषणे झाली.
माझी गंमत करू नका..मी सहन करणार नाही.
अजित पवार म्हणाले, मी जवळच्या कार्यकर्त्यांसाठी सांगतो की, कार्यकर्त्यांनो, मागील निवडणूकीवेळी काही चुका आपल्यातच झाल्या, आता मात्र गंमत करू नका. 44 बुथ आहेत. बुथवाईज मतदान कळणार आहे. ज्यांना उघड करायचे आहे, त्यांनी उघड मतदान करावे. दिवसा इकडे, रात्रीच्या वेळी तिकडे केले, तर कोणाची गंमत ऐकणार नाही. काही जणांना निवडून आणण्यासाठी आम्ही पण रात्रीचा दिवस केला आहे. 30 वर्षे मी सर्वांचे ऐकत आलोय. राष्ट्रवादीच्या कोणीही जरी गडबड केली, तरी त्याला माफ करणार नाही. राष्ट्रवादीच्या घड्याळावर निवडून येऊन जर गद्दारी केली, तर त्याला माफ नाही. सभासदांना आम्ही विनंतीच करू. मात्र जे पदाधिकारी राष्ट्रवादीचे असूनही दुसरा मार्ग निवडतील, त्यामध्ये अगदी तालुकाध्यक्ष संभाजी होळकरांचे जरी चुकले, तरी त्यांनाही माफी नाही.











