बारामती – लोकसभेच्या निवडणूकीनंतर भाजप सरकारने निरा डाव्या कालव्याचे बंद केलेले पाणी ठाकरे सरकारने खुले करीत निरा डावा व उजव्या कालव्यास समन्याय दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत सगळे काही ठिक होईल हा दिलेला शब्द शिवजयंतीच्या दिवशी खरा करून दाखवला. या निर्णयाने निरा डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील बारामती, इंदापूर व पुरंदर तालुक्यातील तब्बल ९१ हजार ५६२ एकर क्षेत्राला फायदा होणार असून अडवलेले पाणी खुले होण्याने यावर्षी उन्हाळ्यात पिके वाचणार आहेत..अर्थात माळेगावची निवडणूक तोंडावर असतानाच सत्ता आल्यावर काय होते, हातात सत्ता असल्यावर काय होते याची प्रचितीही बारामतीकरांना आली आहे..! या निर्णयाने शेतकरी सुखावणार आहेतच, शिवाय या निर्णयाचे दूरगामी परिणामही होणार आहेत. १० जानेवारी रोजी बारामतीकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी पवार यांनी नीरा डाव्या कालव्याच्या पाण्याबाबत स्पष्टीकरण दिले होते. पवार यांनी निरा डाव्या कालव्यासंदर्भात पाठीमागच्या काळात बरेच काही घडले, बरेच बोलले गेले. सरकारच्या या निर्णयामुळे बारामती, इंदापूर व पुरंदर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, मला आताच काही लगेच स्पष्ट बोलता येणार नाही, मात्र एवढेच सांगतो की, सगळे काही नीट होईल, काळजी करू नका.. असे सांगितले होते. अर्थात पवार यांनी जरी हा एकच शब्द उच्चारला असला तरी पवारांच्या कार्यपध्दतीची शैली माहिती असलेल्या शेतकऱ्यांना या शब्दाचा चांगलाच अर्थ माहिती आहे. त्यामुळे नीरा डाव्या कालव्याचे पाणी आपल्याला मिळणार याचा विश्वास शेतकऱ्यांना आला. मागील वर्षी म्हणजे सन 2019 मध्ये इंदापूर, बारामती तालुक्यातील उसाची पिके ऐन दुष्काळात केवळ या पाण्यामुळे जेरीस आली होती, त्यामुळे यंदा काय होणार ही शंका शेतकऱ्यांना सतावत असतानाच पवारांच्या या वाक्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला होता. फक्त हे नीट कधी होणार याचीच उत्सुकता होती. सत्ता आणि राजा बदलला की अनेक धोरणे बदलतात, त्याचाही प्रत्यय शेतकऱ्यांना यानिमित्ताने आला. निरा देवघर धरणाचे काम सन 2007 मध्ये पुर्ण करण्यात आले व 11.73 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला. गुंजवणी धरणात सन 2018 पासून 3.69 टीएमसी पाणीसाठा तयार झाला. मात्र या दोन्ही प्रकल्पांच्या कालव्याची कामे अपूर्ण असल्याने त्यांच्या नियोजीत लाभक्षेत्रात पाणी वापर होऊ शकत नाही, ही बाब विचारात घेऊन या पाण्याचा वापर होण्याच्या दृष्टीने या दोन्ही धरणात उपलब्ध होणारे मूळ प्रकल्पाची गरज भागल्यावर शिल्लक राहणारे पाणी निरा डावा कालवा व निरा उजवा कालवा यात समन्यायी तत्वावर वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे वाटप निरा डावा कालव्यासाठी ५५ टक्के व निरा उजवा कालव्यासाठी 45 टक्के ठेवण्यात आले आहे.










