बारामती : महान्यूज लाईव्ह
माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील विद्यमान सत्ताधारी राज्यातील पहिल्या क्रमांकाचा दर दिल्याची टिमकी मिरवत आहेत. वास्तवात 3400 रुपये हा पहिल्या क्रमांकाचा दर नसून सभासदांना 3800 रुपयांपर्यंत दर मिळायला पाहिजे होता. असे असताना केवळ सभासदांना अधिकचे पैसे मिळतात हे खुपत असल्याने विद्यमान सत्ताधार्यांनी सभासदांच्या खिशाला तब्बल 300 रुपयांची कात्री लावल्याची घणाघाती टिका श्री निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार व विद्यमान संचालक सुरेश खलाटे यांनी केली.
श्री निळकंठेश्वर पॅनलच्या प्रचार दौर्यादरम्यान पाहुणेवाडी येथे बोलताना सुरेश खलाटे यांनी विद्यमान सत्ताधार्यांच्या कारभाराचा भांडाफोड केला. यावेळी माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, बाजार समितीचे संचालक सुनिल पवार, दूध संघाचे माजी अध्यक्ष सतीश तावरे, अविनाश देवकाते, नितीन शेंडे यांच्यासह सर्व उमेदवार, पदाधिकारी उपस्थित होते.
माळेगाव कारखान्याच्या विद्यमान सत्ताधार्यांसोबत आम्ही 2007 पासून काम केले. वेगवेगळी आंदोलने, मोर्चे यात सहभाग घेऊन सत्ताधार्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला. असे असतानाही त्यांनी ऐनवेळी आमच्याशी दगाफटका केला. आम्ही साथ देऊन त्यांनी आम्हाला सोडले नाही, तर सभासदांना कसे सोडतील असा सवाल उपस्थित करुन सुरेश खलाटे म्हणाले, आम्ही त्यांच्यासोबत आंदोलन करताना अनेक खटले दाखल झाले. दिवसाचा खर्च भागवण्याची भ्रांत असणारे लोकही यात सामील झाले. मात्र सत्तेत आल्यानंतर या गुरुशिष्यांनी त्यांच्याकडे ढुंकूनही बघितले नाही. आम्ही संचालक असताना आम्हालाही जाणिवपूर्वक बाजूला ठेवले गेले. संपूर्णपणे मनमानी कारभार करुन ही जोडी हुकुमशाही पद्धतीने वागली.
विद्यमान सत्ताधारी सहकार बचाव पॅनलद्वारे निवडणुक लढवत आहेत. वास्तवात सहकार नेमका कोणापासून वाचवायचा हा सवाल आमच्या मनात आहे. सहकाराच्या नावाखाली शेतकर्यांची शुद्ध फसवणुक करण्याचे काम या लोकांनी केले. त्यामुळेच त्यांची साथ सोडून आम्ही श्री निळकंठेश्वर पॅनलला साथ दिल्याचेही सुरेश खलाटे यांनी सांगितले. सत्ताधार्यांना साखर निर्यात अनुदानाची रक्कम केंद्र सरकारकडून मिळवता येत नाही. परंतू यांच्या गप्पा मात्र मोठमोठ्या असतात. एकूणच काय तर शेतकर्यांच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक करण्याचे काम या सत्ताधार्यांनी केले आहे. त्यामुळे आता त्यांच्या जाणिवपूर्वक केलेल्या चूकांची शिक्षा देण्याची वेळ आली असून निळकंठेश्वर पॅनलच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून देऊन पारदर्शी कारभाराला साथ द्यावी असे आवाहन खलाटे यांनी केले.
विद्यमान सत्ताधारी काटकसरी कारभार करत असल्याचे सांगतात. मात्र प्रत्यक्षात कसलीही काटकसर झालेली नाही. उलट यांच्या मनमानीचा शेतकर्यांच्या खिशावर भार पडला असल्याचे सांगून उमेदवार अनिल तावरे यांनी गुरुशिष्यांनी कारखान्याची अक्षरश: वाट लावल्याची टिका केली. कारखान्याचे फसलेले विस्तारीकरण, डिस्टीलरी, सहवीजनिर्मिती प्रकल्पांची झालेली पिछेहाट अशा मुद्यांना हात घालतानाच त्यांनी कारखान्याच्या विस्तारीकरणानंतर झालेली वाताहत सभासदांसमोर विषद केली.
माळेगाव कारखान्याने केवळ साखर आणि अल्कोहोलवर अवलंबून न राहता उपपदार्थ निर्मितीकडे लक्ष देण्याची सुचना शरद पवार यांनी केली होती. त्यानुसार सहवीजनिर्मिती प्रकल्पाची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यावेळी आताच्या अध्यक्षांनी कारखान्यावर मोठे कर्ज होईल, कारखाना व्यवस्थित चालणार नाही, संचालकांना पदर पैसे द्यावे लागतील अशी भिती दाखवत या प्रकल्पाला विरोध केला. इतकेच नव्हे तर त्यांनी खरेदीदिवशीच उच्च न्यायालयात धाव घेऊन या प्रकल्पाला स्थगिती मिळवत पवारसाहेबांचा अपमान केला. तेच रंजन तावरे सत्तेत आल्यानंतर या प्रकल्पाबाबत दुटप्पी भुमिका घेत सभासदांची दिशाभूल करतात. हे बदलण्याची आता वेळ आली आहे. त्यामुळे सभासदांनी निळकंठेश्वर पॅनलला साथ द्यावी असे आवाहन राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष नितीन शेंडे यांनी यावेळी केले.










