लक्ष्मण जगताप, बारामती.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ .ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन. मागील काही वर्षापासून तो वाचनप्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. कलाम सरांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन स्वतःला तर घडविले. देशाच्या संरक्षण व अवकाश क्षेत्रात त्यांनी केलेले भरीव कार्य कधीही न विसरता येण्यासारखे आहे. देशाच्या सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारुनही त्यांच्या मनाला अहंकाराचा थोडासाही स्पर्श झाला नाही. शिष्टाचाराला फाटा देऊन सार्वजनिक कार्यक्रमात सामान्य लोकांशी आणि शालेय मुलांशी संवाद साधताना त्यांना विशेष आनंद व्हायचा. मुलांना नवी ऊर्जा देऊन जायचा. त्यांचा निगर्वी चेहरा आणि साधेपणा लोकांना भावायचा. सर्वसामान्यांबद्दल त्यांच्या मनात असलेली आपुलकी त्यांना जनतेचा राष्ट्रपती बनवून गेली.
‘वाचाल तर वाचाल ‘यातून वाचनाचे महत्त्व आपल्या लक्षात येते.ज्याप्रमाणे शरीराच्या वाढीसाठी माणसाला अन्नाची गरज असते..त्याप्रमाणे मनाच्या आणि मेंदूच्या मशागतीसाठी वाचन गरजेचे आहे.वाचनाने ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात.विचारांमध्ये परिपक्वता येते. वैचारिक उंची वाढण्यास मदत होते .वाचनाने तुमच्या व्यक्तिमत्त्वाला तेज आणि सूर्यासारखी झळाळी प्राप्त होते. त्यामुळे वाचनात मोठी शक्ती आहे.
पुस्तक कोणतेही असो ते आपल्याला ज्ञान आणि दिशा देते. चांगल्या वाईटाची जाणीव करुन देते. म्हणून प्रत्येकाने वाचन करायला हवे. नवे कोरे करकरीत पुस्तक वाचताना मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. ज्यांनी वाचन छंद जोपासला त्यांचे आयुष्य फुलांप्रमाणे सुगंधीत झाले.
कथा, कविता, कादंबरी, नाटक, आत्मचरिञे, प्रवासवर्णने, ऐतिहासिक पौराणिक ग्रंथ, मासिके, साप्ताहिके, वर्तमानपत्रे अशा स्वरुपात आपल्याकडे वाचन साहित्य उपलब्ध असते. ते साहित्य आपली ज्ञानाची भूक भागविते. परंतु आपण त्याचा उपयोग करुन घेत नाही ही मोठी खंत आहे.
मोबाईल, टिव्ही, फेसबुक, व्हाटसॲप यात आपण एवढे गुंतलो आहोत की हातातील मोबाईल काही केल्या सुटत नाही मग वाचायला वेळ कधी मिळणार?..काही जण म्हणतील, आम्ही मोबाईलमध्ये वाचत असतो, पण ते किती आनंद देते? पुस्तक वाचनाची मजा निराळीच असते. शाळेतील अभ्यासाची पुस्तके सोडून किती मुले अवांतर वाचन करतात हा संशोधनाचा विषय आहे. वाचनासाठी मुलांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. मुळात वाचन हा आपला प्रांत नाही तो बुद्धिमान लोकांचा आहे असे काहींना वाटते, परंतु वाचन हे प्रत्येक माणसाला अत्यंत आवश्यक आहे. ते आपल्याला सक्षम आणि सशक्त बनविते.म्हणून वाचन हा आपला छंद असला पाहिजे. कुटुंबात वाचनसंस्कृती रुजणे काळाची गरज आहे. आजची मुले वाचनापासून दूर जात आहेत.हे चांगले नसून त्याचे दुष्परिणाम भविष्यात पहायला मिळतील. आज अनेक घरात एकाच वेळी मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेले आईबाबा व मुले दिसून येतील, परंतु घरातील सगळे लोक आवडीने अर्धा एक तास पुस्तक वाचतात असे क्वचित ठिकाणी पहायला मिळेल.
अनेक संस्कारांपैकी महत्त्वाचा असा एक वाचनसंस्कार आहे. लहान मुलांच्या बाबतीत तर त्याचे महत्त्व खूप आहे. बाळाच्या वाढीसाठी आईचे दूध महत्त्वाचे आहे, तितकेच मनावरील संस्कारासाठी वाचनाचे महत्त्व आहे. झाडाला खत पाणी वेळेवर दिले की ते चांगले बहरते त्याचप्रमाणे वाचनाने मुलांचे व्यक्तिमत्त्व फुलते. बोधकथा, संस्कारकथा, रहस्यकथा, बिरबल बादशाहाच्या कथा, आत्मचरिञे इ. वाचल्याने मुलांच्या जडणघडणीवर खूप मोठा सकारात्मक परिणाम होतो. त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होतो. शब्दसंपत्तीत भर पडते. वक्तृत्व कला आणि लेखनकला उत्तम प्रकारे विकसित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लहान असताना त्यांचे वडील कर्जाने पैसे घेऊन त्यांना वाचनासाठी पुस्तके पुरवायचे. आपल्या मुलाची वाचनाची भूक भागविण्यासाठी त्यांनी कधीही कसूर केली नाही. वाचनाने बाबासाहेबांच्या आयुष्याचा कायापालट झाला. हे आपण जाणतोच. स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, विनोबा भावे, सानेगुरुजी, डॉ. अब्दुल कलाम तर आताच्या काळातील नामवंत कीर्तीवंत अशी अनेक माणसं आहेत ज्यांनी वाचनाचा अखंड ध्यास घेतला होता. वाचनामुळे त्यांचे आयुष्यच बदलून गेले.
संस्कारक्षम वयात मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी शाळांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तके मुलांच्या हातात जावीत. त्यांनी ती मनापासून वाचावित.यासाठी प्रोत्साहनपर अभिनव अशा विविध स्पर्धा ,उपक्रम यांचे सातत्याने आयोजन झाले पाहिजे. फक्त वाचनप्रेरणा दिनापुरतेच वाचन न करता त्यात सातत्य राहिले पाहिजे. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. दहा पंधरा हजाराचा मोबाईल घेताना आपण पैशाचा विचार करत नाही पण शंभर दिडशे रुपयांचे पुस्तक घेताना आपण दहावेळा विचार करतो. कारण पुस्तकापेक्षा आज मोबाईल महत्त्वाचा वाटतो.मोबाईलपण गरजेचा आहे. परंतु शे दोनशे रुपयाचे पुस्तक मुलांच्या आयुष्यात टर्निग पॉईन्ट ठरु शकते याचा आपल्याला विसर पडतो.
जगामध्ये तुम्हाला स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करायचे असेल, स्वतः ची वेगळी ओळख निर्माण करायची असेल, विद्वान बुद्धिमान व ज्ञानी बनायचे असेल, समृद्ध व्हायचे असेल तर वाचनाशिवाय दुसरा पर्याय नाही.
वाचनाच्या जोरावरच आजही अनेक वक्ते लाखोच्या सभा गाजवितात. वाचनाने मनाला प्रसन्नता लाभते.चारचौंघात वावरताना नवा आत्मविश्वास प्राप्त होतो. वैचारिक बैठक पक्की बनते.तुमच्या हातात पुस्तक असेल तर सुसंस्कृतपणा व सुविधा आपली हस्तक बनते.
एखाद्या पुस्तकाच्या वाचनाने अंधारात चाचपडणा-याला आशेचा नवा प्रकाश किरण सापडतो. संघर्षाची प्रेरणा मिळते.
संवेदनशीलतेची जाणीव होते. वाचलेली पुस्तके माणसाला खूप काही शिकवून व सांगून जातात, म्हणून पुस्तकात रमले पाहिजे. एक वेळ माणसे धोका देतील पण पुस्तके देणार नाहीत. पुस्तकांशी मैत्री केली पाहिजे. त्यातील निर्जीव शब्दांशी नाते जडले तर ते सजीव होऊन आपल्याशी बोलू लागल्याचा भास होतो. त्यासाठी आपल्या वाचनात एकाग्रता असायला हवी.
लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला वाचनाचा छंद असला पाहिजे. वयोगटानुसार प्रत्येकाची आवड भिन्न असू शकते. कुणाला आत्मचरिञ आवडेल, कुणाला कथासंग्रह आवडेल, कुणाला कवितासंग्रह आवडेल,पण त्यानिमित्ताने वाचन तर होईल.
अनेक शहरात वाचनप्रेमी व्यक्तींनी एकत्र येऊन वाचनक्लब सुरू केले आहेत. अनेक ठिकाणी महिला पुस्तकभिशी सारखा उपक्रम राबवितात.महिन्याच्या शेवटी वाचलेल्या पुस्तकावर चर्चा करुन विचारांची देवघेव केली जाते.सार्वजनिक मंडळे किंवा सेवाभावी संस्था यांच्या वतीने वाचन चळवळीसाठी खूप मोठे योगदान दिले जाते. अनेक ठिकाणी ग्रंथालये आहेत. त्या त्या ग्रंथालयात अनेक पुस्तके आहेत.परंतु ठराविक मर्यादेच्या पलीकडे वाचक वर्ग वाढत नाही.त्यासाठी वाचनाबद्दल असणारा नकारात्मक दृष्टिकोन बदलला पाहिजे. प्रत्येकाला वाचनाचे महत्त्व लक्षात आले पाहिजे.यासाठी गावात वाचन सप्ताह आयोजित केले पाहिजेत. लोकांनी एकत्र येऊन पुस्तकांची निवड करुन एकञितपणे पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. वाचलेल्या पुस्तकावर चर्चा, परिसंवाद, सुसंवाद घडवून आणले पाहिजे. याचा निकोप समाजनिर्मितीसाठी खूप मोठा फायदा होऊ शकतो.
वाचनामुळे माणसे एकमेकांशी जोडली जातात. म्हणूनच जोडलेल्या वाचनप्रेमी माणसांच्या माध्यमातून वाचनसंस्कृती जोपासूयात..











