भवानीनगर : इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील छत्रपती शिक्षण संस्थेच्या छत्रपती मुलींच्या हायस्कूलमध्ये माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मुलींच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास, संस्कार, व्यक्तिमत्त्व घडविणे आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी त्यांना सक्षम बनविणे, या विषयांवर मेळाव्यात सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी माता पालक, शिक्षक आणि विद्यार्थिनी यांची आपल्या-आपल्या भूमिकेतील कर्तव्ये याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थिनींच्या प्रगतीसाठी केवळ शाळेतील शिक्षण पुरेसे नसून घर आणि शाळा यांच्यात सातत्यपूर्ण संवाद व समन्वय असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. पालकांनी मुलींच्या अभ्यासाकडे लक्ष देण्याबरोबरच त्यांच्या अडचणी समजून घेणे, त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधणे, त्यांच्या गुणांना व आवडींना प्रोत्साहन देणे आणि योग्य संस्कार घडविण्यासाठी वेळ देणे गरजेचे असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
शिक्षकांची भूमिका केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यापुरती मर्यादित नसून विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व विकासाला दिशा देणे, त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे, आत्मविश्वास वाढविणे आणि त्यांच्यामध्ये शिस्त, जबाबदारीची जाणीव, संवेदनशीलता व सामाजिक भान निर्माण करणे हीदेखील तितकीच महत्त्वाची असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थिनींनी नियमित अभ्यास, वेळेचे नियोजन, शिस्त, शिक्षक व पालकांचा आदर तसेच स्वतःच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची काळजी घेण्याबरोबरच चांगले संस्कार आत्मसात करण्यावर भर द्यावा, असे आवाहन करण्यात आले.
मुख्याध्यापिका सुरेखा गोरे यांनी मुलींच्या जडणघडणीबाबत मार्गदर्शन करताना शिक्षणासोबतच संस्कार आणि आत्मविश्वास यांना विशेष महत्त्व असल्याचे सांगितले. आजच्या बदलत्या वातावरणात मुलींना केवळ परीक्षेत चांगले गुण मिळवून देणे हा उद्देश न ठेवता त्यांना सक्षम, स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि जबाबदार नागरिक म्हणून घडविण्यासाठी पालक व शिक्षकांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मुलींच्या भावनिक गरजा समजून घेऊन त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांच्या अडचणींकडे संवेदनशीलतेने पाहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी विविध खेळ व मनोरंजनात्मक उपक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही सुरेखा गोरे यांनी दिली. दैनंदिन कामाच्या धावपळीत महिलांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांना काही काळ विरंगुळा मिळावा, एकत्र येऊन आनंदाचे क्षण अनुभवता यावेत आणि रोजच्या जबाबदाऱ्यांपासून काही वेळ वेगळे होऊन नवीन ऊर्जा मिळावी, या उद्देशाने महिलांसाठी खेळांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माता पालक मेळाव्यामुळे पालक आणि शाळा यांच्यातील संवाद अधिक दृढ होण्यास मदत झाली. विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणासोबत संस्कार, शिस्त, आत्मविश्वास आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्याचा संदेश या मेळाव्यातून देण्यात आल्याचे माता पालक पूनम गुप्ते यांनी सांगितले.










