भिगवण : उजनी जलाशयातील प्रस्तावित मासेमारीच्या ठेक्याला विरोध करण्यासाठी जलाशय परिसरातील स्थानिक मच्छिमारांनी पुकारलेल्या आंदोलनाला विविध गावांतून प्रतिसाद मिळाला. भिगवणसह उजनी जलाशय परिसरातील ४० ते ४५ गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयांसमोर मच्छिमारांनी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करून प्रस्तावित ठेक्याला तीव्र विरोध दर्शविला.

सरकार रोजगारनिर्मितीची भूमिका मांडत असताना पारंपरिक पद्धतीने उपलब्ध असलेला मासेमारीचा व्यवसायच काढून घेतला जात असल्याचा आरोप ‘उजनी मच्छिमार बचाव अभियान’च्या पदाधिकाऱ्यांनी केला. ऊन, वारा, पाऊस आणि थंडीचा सामना करीत मासेमारीच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छिमारांच्या रोजगारावर गदा आल्यास त्यांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून उजनी जलाशयातील मासेमारीचा ठेका काढण्यात आल्याने हजारो स्थानिक मच्छिमारांमध्ये नाराजी आहे. प्रस्तावित ठेकेदारीमुळे पारंपरिक मच्छिमारांसह भूमिहीन, पारधी आणि मागासवर्गीय मच्छिमारांच्या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनाची तीव्रता वाढत असून, संबंधित गावांच्या ग्रामपंचायतींकडून ठेक्याला विरोध करणारे ठराव देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
दरम्यान, आंदोलनाची दखल घेत ४० हून अधिक ग्रामपंचायतींनी यासंदर्भात ठराव देण्यास सुरुवात केल्याचे अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मच्छिमारांच्या पारंपरिक रोजगाराचे संरक्षण आणि उपजीविकेचा प्रश्न ग्रामपंचायत ठरावांमधून मांडला जात असल्याने आंदोलनाला पुढील काळात कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर आधार मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
या आंदोलनादरम्यान फासेपारधी समाजातील मच्छिमारांनीही प्रशासनावर खोचक टीका केली. “उजनीतील मासेमारीमुळे चोऱ्या-माऱ्या सोडल्या आहेत; आमचा रोजगार काढून घेतला तर तुमचे काम पुन्हा वाढेल,” असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला. भिगवण, पळसदेव, राजेगाव, मलठण, डाळज, केतूर, बाभूळगाव, कात्रज, खानोटा, डीकसळ, चिखलठाण, रामवाडी, भादलवाडी, कुंभारगाव, सोगाव, खातगाव, आजोती, सुरळी, कळाशी, दिलमेश्वर, कुगाव, कोंढार चिंचोली, गलांडवाडी, टाकळी आदी गावांमध्ये मच्छिमारांनी उपोषण केले.
उजनी जलाशयातील मासेमारीचा पारंपरिक व्यवसाय टिकवून ठेवावा आणि स्थानिक मच्छिमारांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. अभियानाचे पदाधिकारी चंद्रकांत भोई, अनिल नगरे, अनिता नगरे, उज्वला परदेशी, विक्रम शेलार, बाळासाहेब काळे, दत्तात्रय व्यवहारे, संजय दरदरे, शरद गलांडे, हरिभाऊ जाधव, सदगुरू शिंदे, अंगात गायकवाड, अमोल पतुरे, नाना दरदरे, उत्तम दरदरे, बाळासाहेब गाडेकर, चिंतामण तिकोणे, पिंटू शिंदे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.











