संदीप मापारी पाटील, बुलढाणा
लोणार : सुलतानपूरसह लोणार तालुक्यात महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरू असून, नागरिकांवर सक्तीने स्मार्ट मीटर बसविले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही सक्ती तात्काळ थांबवावी, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख नागवंशी संघपाल पनाड यांनी दिला आहे.
याबाबत ऊर्जा मंत्र्यांसह महावितरणच्या लोणार कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे. सुलतानपूर ग्रामपंचायतीच्या वतीने स्मार्ट मीटर बसविण्यात येऊ नयेत, यासाठी ग्रामसभेत ठराव घेण्यात आला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, ग्रामसभेच्या ठरावानंतरही महावितरणचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांवर दबाव आणून स्मार्ट मीटर बसवित असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप
महावितरणचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांना दहशतीच्या वातावरणात स्मार्ट मीटर स्वीकारण्यास भाग पाडत असून, विरोध केल्यास गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांनी सक्तीची कारवाई तात्काळ थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया नागरिकांच्या संमतीने आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात यावी. ग्रामसभेच्या ठरावाची दखल घेऊन प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. स्मार्ट मीटरची सक्ती थांबवली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारण्यात येईल. तसेच ‘जोडोमारो’ आंदोलन छेडण्याचा इशारा नागवंशी संघपाल पनाड यांनी दिला आहे.
यावेळी नागवंशी संघपाल पनाड, अनित्य घेवंदे, अख्तर भाई, दामुअण्ण सुरूशे, पुरुषोत्तम गाडेकर, डॉ. देसाई, गोविंद मंत्री, सुखदेव देसाई, संतोष शिंदे, संतोष पाटील, अमीर भाई, सद्दाम भाई, गणेश रत्नपारखी, असिम पठाण, दामोधर कुकडे यांच्यासह शेकडो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन प्रशासनाला देण्यात आले.
निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी बुलढाणा, महावितरण मुख्य कार्यकारी अभियंता बुलढाणा, जिल्हा पोलीस अधीक्षक, लोणारचे तहसीलदार तसेच मेहकरच्या पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.











