सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याचे रोहित पवारांचे आवाहन
बारामती : आर्थिक शिस्त, उत्कृष्ट व्यवस्थापन आणि शेतकरीहिताच्या कामामुळे राज्यातील अग्रगण्य सहकारी साखर कारखान्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लवकरच होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला महत्त्वाचे आवाहन केले आहे.
कारखान्याची निवडणूक राजकीय संघर्षाचा विषय न बनवता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने सक्षम आणि कार्यक्षम उमेदवार देऊन ती बिनविरोध करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. रोहित पवार यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून ही भूमिका स्पष्ट केली. सोमेश्वर कारखान्याने गेल्या अनेक वर्षांत आर्थिक शिस्त आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या माध्यमातून साखर उद्योगात आपला स्वतंत्र ठसा उमटवला असल्याचे त्यांनी नमूद केले. अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने केलेल्या वाटचालीचाही त्यांनी विशेष उल्लेख केला.
अजितदादांच्या कार्याची परंपरा पुढे नेण्याचे आवाहन
अजित पवार यांच्या निधनाला अद्याप एक वर्षही पूर्ण झालेले नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या कर्तृत्वाकडे आणि नेतृत्वाकडे पाहून सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने सामंजस्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. अजितदादांच्या कर्तृत्वाकडे आणि नेतृत्वाकडे पाहून या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीने कार्यक्षम उमेदवार देऊन ही निवडणूक बिनविरोध करावी, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
तसेच अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीने कारखाना चालत होता, त्याच पद्धतीने भविष्यातही शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी ठेवून कारखान्याचे कामकाज सुरू राहावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. सहकारात राजकारण बाजूला ठेवण्याचा संदेश देत त्यांनी असे स्पष्ट केले आहे की, सोमेश्वर हा केवळ राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा कारखाना नसून त्याच्याशी हजारो सभासद शेतकरी, ऊस उत्पादक आणि कामगारांचे हित जोडलेले आहे. त्यामुळे सहकार संस्थांच्या निवडणुकांमध्ये राजकीय स्पर्धेपेक्षा सभासदांच्या हिताला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमधून सूचित केले.
शेवटी हे सहकार क्षेत्र असल्याने सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी इथं राजकारण बाजूला ठेवलं तर उत्तमच आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी परस्पर सामंजस्यातून निर्णय घेतला, तर तो सहकार क्षेत्रासाठी सकारात्मक संदेश ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रोहित पवार यांच्या या आवाहनातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोमेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करून शेतकरीहिताचे काम पुढे नेणे हीच अजित पवार यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा त्यांनी व्यक्त केलेला भाव.
त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते या आवाहनाला कसा प्रतिसाद देतात, याकडे सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांचे आणि बारामती तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीच्या राजकारणात निर्माण झालेल्या नव्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी केलेले हे आवाहन महत्त्वाचे मानले जात आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सहकार क्षेत्रातील महत्त्वाची संस्था बिनविरोध चालविण्याचा प्रस्ताव त्यांनी पुढे केल्याने आता दोन्ही राष्ट्रवादींच्या नेतृत्वाची भूमिका काय राहणार, याची उत्सुकता आहे.











