एकाच दिवशी चार वॉरंटमधील पाच आरोपी जेरबंद; बारामती शहर पोलिसांची पहाटेपासून धडक मोहीम
बारामती : न्यायालयाकडून वारंवार समन्स बजावूनही सुनावणीस गैरहजर राहणाऱ्या आणि अटक वॉरंट प्रलंबित असलेल्या पाच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात बारामती शहर पोलिसांना यश आले आहे. एकाच दिवशी चार वेगवेगळ्या न्यायालयीन वॉरंटमधील पाच आरोपींना शोधून अटक करत पोलिसांनी न्यायालयीन आदेशाची प्रभावी अंमलबजावणी केली.
पहाटे पाच वाजल्यापासून सुरू करण्यात आलेल्या या विशेष मोहिमेमुळे वॉरंटधारक आरोपींमध्ये चांगलीच खळबळ उडाली. या कारवाईत भोल्या ऊर्फ किशोर बापू भिसे, सनी दत्तात्रय ऊर्फ शिवदत्त गायकवाड, अनिकेत दत्तात्रय ऊर्फ शिवदत्त गायकवाड, गणेश मारुती दळवी आणि मोहसीन इकबाल बागवान या पाच जणांना अटक करण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे पहाटेपासून शोधमोहीम
न्यायालयीन वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी बारामती शहर पोलीस ठाण्याचे वॉरंट अंमलदार पोलीस हवालदार उदय टापरे यांनी गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय केले होते. आरोपींच्या वास्तव्याची तसेच त्यांच्या हालचालींची माहिती मिळवल्यानंतर तिची स्थानिक पातळीवर पडताळणी करण्यात आली. त्यानंतर पहाटे पाच वाजल्यापासून पोलिसांच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी शोधमोहीम राबवली. नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत पोलिसांनी पाचही आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्याविरुद्ध जारी असलेल्या अटक वॉरंटची अंमलबजावणी केली.
कोणत्या प्रकरणात कोणावर वॉरंट?
भोल्या ऊर्फ किशोर बापू भिसे याच्याविरुद्ध बारामती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील सत्र प्रकरण क्रमांक 102/2025 मध्ये भारतीय न्याय संहितेतील कलम 103(1), 61(2), 189(2), 189(4), 191(2), 191(3), 190 अन्वये प्रकरण प्रलंबित आहे. न्यायालयाने 14 ऑगस्ट 2026 रोजी त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते.
सनी दत्तात्रय ऊर्फ शिवदत्त गायकवाड आणि अनिकेत दत्तात्रय ऊर्फ शिवदत्त गायकवाड या दोघांविरुद्ध प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय, बारामती येथील RCC क्रमांक 415/2015 मध्ये Arms Act अंतर्गत प्रकरण प्रलंबित असून त्यांच्याविरुद्ध न्यायालयीन पकड वॉरंट जारी करण्यात आले होते. गणेश मारुती दळवी, रा. डोर्लेवाडी, बारामती, याच्याविरुद्ध प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयातील RCC क्रमांक 277/24 मधील प्रकरणात पकड वॉरंट जारी करण्यात आले होते. तर मोहसीन इकबाल बागवान, रा. कचेरी रोड, बारामती, याच्याविरुद्ध वैष्णवी नगरी पतसंस्था प्रकरणात परक्राम्य लेख अधिनियमाच्या कलम 138 अन्वये खटला प्रलंबित असून न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते.
पाचही आरोपी न्यायालयासमोर
अटक वॉरंटची अंमलबजावणी केल्यानंतर पोलिसांनी पाचही आरोपींना संबंधित न्यायालयांसमोर हजर केले. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची जेल कस्टडीमध्ये रवानगी करण्यात आली. या कारवाईत पोलीस हवालदार उदय टापरे यांच्यासह पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर, यशवंत पवार, तसेच पोलीस शिपाई गिरीश नेवसे, अक्षय सिताफ आणि तुषार शिंदे यांनी सहभाग घेतला. एकाच दिवशी चार वेगवेगळ्या न्यायालयीन वॉरंटमधील पाच आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आल्याने बारामती शहर पोलिसांच्या वॉरंट अंमलबजावणी पथकाच्या कामगिरीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आले.
अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी पोलीस हवालदार उदय टापरे आणि त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले आहे. न्यायालयीन आदेश केवळ कागदावर न राहता त्याची वेळेत अंमलबजावणी करण्यासाठी बारामती शहर पोलिसांकडून यापुढेही अशा विशेष मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.










