ज्ञानेश्वर रायते, बारामती
कला जेव्हा वास्तवाचा आरसा बनते, तेव्हा ती केवळ पडद्यापुरती उरत नाही, तर आपल्या आसपास घडलेल्या खऱ्याखुऱ्या शौर्याची आठवण करून देते. प्रसिद्ध मल्याळम अभिनेता मामूटी यांचा ‘कन्नूर स्क्वाड’ (Kannur Squad) हा क्राईम थ्रिलर चित्रपट पाहताना चित्रपटगृहातील पडद्यावर घडणारा थरार जितका अंगावर काटा आणणारा होता, तितकाच तो बारामतीकरांच्या मनाला एका वेगळ्याच अभिमानास्पद प्रवासाकडे घेऊन जाणारा ठरला.
हा चित्रपट पाहताना बारामतीतील राष्ट्रपती पदक विजेते निवृत्त पोलीस अधिकारी अनिलअण्णा जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अंगावर शहारे आणणाऱ्या कर्तबगारीची आठवण झाली. चित्रपटातील ‘कन्नूर स्क्वाड’ आणि बारामतीचे ‘विशेष गुन्हे शोध पथक’ यांच्यातील हे साम्य केवळ योगायोग नसून खाकी वर्दीतील कर्तव्यनिष्ठा आणि जिद्दीची ती एकच गाथा आहे.
मराठी मातीतील लोकेशन्स आणि चित्रपटाचा थेट कनेक्ट
मोहम्मद शफी आणि रॉनी डेव्हिड राज यांनी लिहिलेली कथा आणि रॉबी वर्गिस राज यांचे दिग्दर्शन प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवते. चित्रपटात पोलीस अधिकारी जॉर्ज मार्टिन (मामूटी) आणि त्यांचे तीन सहकारी एका गुंतागुंतीच्या खून प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तुटपुंज्या साधनांनिशी राज्यांची सीमा ओलांडून प्रवास करतात.
विशेष म्हणजे, या चित्रपटातील कथानकात उत्तर प्रदेशातील फैजाबाद किंवा आसपासच्या गावांचा उल्लेख असला, तरी प्रत्यक्षात या सीन्सचे चित्रीकरण आपल्या महाराष्ट्रातील सातारा आणि आसपासच्या निसर्गरम्य मुलखात झाले आहे. मामूटी आणि त्यांची टीम प्रवास करताना साताऱ्यातील अणेवाडी टोल नाका क्रॉस करताना दिसतो..पडद्यावर उत्तर प्रदेशचे नाव असले तरी स्क्रीनवर दिसणाऱ्या दुकानांच्या पाट्या, ग्रामपंचायतीच्या नावाचे फलक मराठीत ठसठशीत चमकतात; अगदी एका पिकअप जीपवर ‘सूर्यवंशी मांडववाले’ असा स्पष्ट मराठी मजकूरही लक्ष वेधून घेतो. त्यामुळे पटकथेत महाराष्ट्राचा थेट उल्लेख नसला, तरी मराठी मातीच्या स्पर्शामुळे हा चित्रपट आपल्या भागाशी अधिक जवळीक साधतो आणि त्यामुळेच तो बारामतीच्या आठवणीकडे घेऊन जातो..!
बारामतीचे रिअल-लाईफ ‘कन्नूर स्क्वाड’
चित्रपटातील रील-लाईफ थरार पाहताना डोळ्यांसमोर उभे राहते ते बारामतीचे प्रत्यक्ष काम केलेले रिअल विशेष गुन्हे शोध पथक. २३ ऑगस्ट २००२ रोजी तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी संजय मोहिते यांनी बारामती उपविभागातील वाढत्या गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी या विशेष पथकाची स्थापना केली होती.
या पथकात सहाय्यक फौजदार अनिल जाधव, हवालदार अशोक पाटील, हवालदार अनिल काळे, रविराज कोकरे आणि अशाच आणखी काही जिगरबाज आणि निष्ठावंत अधिकाऱ्यांचा समावेश होता. ही केवळ एक टीम नव्हती, तर शिस्त, माणुसकी आणि धाडसाचा एक आदर्श संगम होती. त्यांची गुन्हा शोध करण्याची पद्धत देखील अफलातून होती. दिसायला अत्यंत नम्र आणि सामान्य वाटणारे हे अधिकाऱ्यांचे पथक भल्या भल्या सराईत गुन्हेगारांना मात्र उरात धडकी भरवत असे.
मर्यादित साधने, पण अफाट जिद्द
चित्रपटात जसे ‘कन्नूर स्क्वाड’चे अधिकारी एका जुन्या बोलेरो गाडीतून, मर्यादित बजेट आणि शासकीय अडचणींचा सामना करत आरोपींचा माग काढतात, तशीच काहीशी परिस्थिती बारामतीच्या या पथकाची होती. आधुनिक तंत्रज्ञान किंवा अद्ययावत संसाधने नसतानाच्या काळात या पथकाने केवळ स्वतःचे खबरे, स्थानिक गुप्त माहितीचे जाळे, सूक्ष्म निरीक्षण आणि अचाट कौशल्याच्या जोरावर अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल केली.
रात्रं-दिवस अन्नाचा कण आणि झोपेची पर्वा न करता, स्वतःच्या जीवाची बाजी लावून या अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांचा पाठलाग केला. हे पथक जोपर्यंत बारामतीत सक्रिय होते, तोपर्यंत कोणत्याही सराईत गुन्हेगाराची किंवा टोळीची बारामतीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत झाली नाही. गुन्हेगारांमध्ये या पथकाचा दरारा असा होता की, ‘बारामती’ हे नाव ऐकताच गुन्हेगारी जगतात घबराट पसरत असे.
खाकी वर्दीतील माणुसकी आणि अभिमानास्पद वारसा
जितकी शिस्तप्रिय ही टीम होती, तितकीच ती माणुसकी जपणारीही होती. सामान्य नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास देणे आणि पीडितांना न्याय मिळवून देणे हेच या टीमचे एकमेव ध्येय होते. पडद्यावरील जॉर्ज मार्टिन असो वा बारामतीचे अनिलअण्णा जाधव आणि त्यांची टीम, या सर्वांनी हे सिद्ध केले की पोलिसांचे बलस्थान केवळ शस्त्रे किंवा गाड्या नसतात, तर त्यांच्या रक्तातील प्रामाणिकपणा आणि निडर वृत्ती असते.
चित्रपटांमधील सीन पाहून आपण टाळ्या वाजवतो, परंतु चित्रपटगृहातील टाळ्यांच्या कडकडाटाच्या पलीकडे जाऊन आपण जेव्हा आपल्याच मातीतील अशा खऱ्याखुऱ्या रक्षकांचे स्मरण करतो, तेव्हा उर अभिमानाने भरून येतो. बारामतीच्या या पराक्रमी पोलीस पथकाला आणि त्यांच्या अतुलनीय सेवेला मानाचा मुजरा!










