डॉ. संदेश शहा, पुणे
कात्रज येथील दत्तनगरमधील आनंद दरबारात ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त आचार्य सम्राट आनंदऋषीजी महाराज यांच्या भव्य आराधना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराजांच्या प्रतिमा तसेच १४ शुभचिन्हांनी अलंकृत कमलाकृती चरणपादुकांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांच्या नेतृत्वाखाली हा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.
यावेळी बोलताना बाळासाहेब धोका यांनी आचार्य सम्राट आनंदऋषीजी महाराज यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, अहिल्यानगर जिल्ह्यातील चिंचोडी येथे जन्मलेल्या आनंदऋषीजी महाराजांना बालपणापासूनच अध्यात्म, कीर्तन आणि भजनाची आवड होती. त्यांनी अल्पवयातच सांसारिक जीवनाचा त्याग करून सन १९१३ मध्ये जैन श्रमण दीक्षा स्वीकारली. कठोर तपश्चर्या, स्वाध्याय, प्रभावी प्रवचने, संघटन कौशल्य आणि समाजप्रबोधनाच्या कार्यामुळे त्यांना “आचार्य सम्राट” हा बहुमान प्राप्त झाला.
देशभरात त्यांनी जैन आगमांचा प्रसार करताना अहिंसा, सत्य, संयम, व्यसनमुक्ती, नैतिक मूल्ये आणि मानवसेवेचा संदेश दिला. त्यांच्या प्रत्येक प्रवचनाची सुरुवात संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने होत असे. महाराष्ट्र ही त्यांची जन्मभूमी असली तरी संपूर्ण भारत ही त्यांची कर्मभूमी ठरल्याने त्यांना राष्ट्रसंत म्हणूनही गौरविले जाते.
भारतात प्रथमच आचार्य सम्राट आनंदऋषीजी महाराज यांच्या प्रतिमा आणि १४ शुभचिन्हांनी युक्त कमलाकृती चरणपादुकांची स्थापना दत्तनगर येथील आनंद दरबारात करण्यात आल्याचे बाळासाहेब धोका यांनी सांगितले. त्यांच्या कार्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने दर पौर्णिमेला ‘आनंद उत्सव’ आयोजित करण्यात येत असून या उपक्रमाला सर्वधर्मीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात मनोज मुकेश छाजेड, सौ. उज्वला शरद लुणावत आणि विआन सूरज पारख यांनी प्रभावना व प्रसादीचे आयोजन केले. यावेळी शरद लुणावत, अशोक कटारिया, रमेशचंद संचेती, पन्नालाल भंडारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आनंद दरबार संचलित श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक आनंद रत्न जैन स्थानक, दत्तनगर संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.











