पुणे : पुणे ग्रामीण जिल्ह्यातील तब्बल 1,196 ग्रामपंचायतींमध्ये आपत्कालीन सूचना, ग्रामसभा, शासकीय योजना, नैसर्गिक आपत्ती, वन्यप्राण्यांचा धोका तसेच गुन्हे व दुर्घटनांबाबत नागरिकांना क्षणार्धात माहिती पोहोचविणारी ‘ग्राम सुरक्षा यंत्रणा’ निधीअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या यंत्रणेचा टोलफ्री क्रमांक 1800-270-3600 वरील सेवा 5 जुलै 2026 पासून पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे.
पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पुढाकारातून फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमामुळे एका फोन कॉलद्वारे गावातील सर्व नोंदणीकृत नागरिकांच्या मोबाईलवर तात्काळ संदेश किंवा व्हॉईस कॉल पोहोचविण्याची सुविधा उपलब्ध झाली होती. पुणे जिल्ह्यातील 11 लाख 27 हजार 924 नागरिक या यंत्रणेशी जोडले गेले. प्रती कुटुंब पन्नास रुपये दर वर्षासाठी या यंत्रणे करता निधी ग्रामपंचायतींकडून घेतला जातो.
थोडक्यात हे 11 लाख 27 हजार 924 जे ग्रामस्थ जोडलेले आहेत, ते प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती याप्रमाणे जोडलेले आहेत. आतापर्यंत 36 हजार 782 हून अधिक वेळा या सुविधेचा नागरिक व प्रशासनाने प्रभावी वापर केला आहे. यंत्रणेच्या सूत्रांकडील माहितीनुसार एकंदर वार्षिक निधीचा विचार करता जोडले गेलेले ग्रामस्थ व वार्षिक पन्नास रुपये निधीचा विचार करता पाच कोटी 63 लाख रुपयांची गरज ही यंत्रणा सुरू ठेवण्यासाठी असते. मात्र यंदा जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी याची नुतनीकरण केलेले नाही.
ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून चोरी, दरोडे, हरवलेली मुले व जनावरे शोधणे, ऊस, जंगल व गायरानातील आगी विझवणे, नैसर्गिक आपत्तींची माहिती देणे, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांबाबत नागरिकांना सतर्क करणे अशा अनेक घटनांमध्ये पोलिसांना आणि ग्रामस्थांना मोठे यश मिळाले आहे. बारामती, शिरूर, शिक्रापूर, वालचंदनगर, यवत, दौंड, मंचर, जुन्नर, लोणावळा, सासवड, इंदापूर, पौड, राजगड आदी भागांतील अनेक महत्त्वाच्या घटनांमध्ये या यंत्रणेने प्रभावी भूमिका बजावली असल्याचा दावा ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या संचालकांच्या वतीने करण्यात आला आहे.
ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे पाटील यांनी सांगितले की, या सेवेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र ग्रामपंचायतींकडून निधीची तरतूद न झाल्याने आणि प्रशासनाकडूनही आवश्यक प्रयत्न न झाल्याने ही सेवा सुरू ठेवणे अशक्य झाले आहे. त्यामुळे 5 जुलै 2026 पासून टोलफ्री सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.










