शशांक मोहिते, भाषण कला प्रशिक्षक, बारामती
२८ एप्रिल २०१८ रोजी ची घटनाः स्थळ- जोगेश्वरी येथील रविंद्र वायकरांचे मातोश्री क्लब. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दवसाहेब, आदित्यजी, सुभाषजी देसाई हे शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांसाठी आयोजित ‘वक्ता प्रशिक्षण’ कार्यक्रमाच्या उदघाटन समारंभासाठी आले होते. मार्गदर्शक वक्ते म्हणुन प्रसिध्द शिवव्याख्याते नितीन बानुगडे पाटील व मला निमंत्रित करण्यात आले होते. दोन्ही सत्राला उध्दवसाहेब शिवसैनिकांबरोबर उपस्थित राहिले. त्यानंतर ते नियोजित कार्यक्रमांसाठी पुढे गेले.
सत्र संपल्यानंतर जेवण करत असताना राज्यसभेचे खासदार अनिलजी देसाई म्हणाले,”शशांकसर, ०२ मे ही तारीख राखुन ठेवा. उध्दवसाहेबांचा निरोप आहे. कदाचित तुम्हाला मातोश्री बंगल्यावर यावे लागेल.” ऐकताना मला ठसका लागला. बाप रे, मातोश्री…! खरं सांगतो, मी त्यावेळी ते फारसं गांभीर्याने घेतले नव्हते. यापुर्वी अशाच पध्दतीने अनेक राजकीय पुढार्यांनी आपण एकदा निवांत भेटुया असे आश्वासन दिले होते.त्या निवांत भेटींची वाट पाहता पाहता १८ वर्षे अशीच निघुन गेली होती.
नंतर १ मे २०१८ ला परत तसा फोन आल्यानंतर २ मे रोजी मुंबई गाठली. मातोश्रीच्या प्रवेशद्वाराजवळ सुरक्षाव्यवस्थेचे सोपस्कार पार पडल्यानंतर आमची सुटका झाली. शिवसेनेच्या वक्ता प्रशिक्षण शिबिरासंदर्भातील पुढील नियोजनासाठी माननीय उध्दवसाहेब ठाकरे, खासदार अनिलजी देसाई, प्रसिध्द व्याख्याते नितीनजी बानुगुडे पाटील व आम्ही पामर उर्फ शशांक मोहिते अशी फक्त चौघांचीच बैठक ‘मातोश्री’ बंगल्यामधील एका अँटीचेंबरमध्ये तासभर चालली. ( हे असं अँटीचेंबरमध्ये मिटींग करताना लई भारी वाटतं राव. आपणही राज्याचे धोरण ठरवतोय की काय असंच वाटत राहतं.)
बैठकीदरम्यान खानापुर आटपाडीचे आमदार अनिलजी बाबर लग्नपत्रिका घेऊन निमंत्रण द्यायला आल्याचा निरोप मिलिंद नार्वेकरांनी दिला असता उध्दवसाहेबांनी आमदार अनिलजींना तिथेच बोलावले. आमदार येताच उध्दवजींनी उभे राहुन नम्रपणे हात जोडुन नमस्कार करुन ती लग्नपत्रिका स्वीकारली, हे मला महत्वाचं वाटलं आणि आवर्जुन तुम्हाला शेअर करावंसं वाटलं. (समोरच्याला आपण कसं वागवतो यावर आपलाही मोठेपणा ठरतो. हे आदरणीय पवारसाहेबांकडुन आपण शिकलो आहोतच! )
आमदार माघारी गेल्यानंतर आमची बैठक परत सुरु झाली. बैठकीदरम्यान जाणवलं की उद्धवजी चांगले श्रोते आहेत. शांतपणे समोरच्याचे मत, प्रतिक्रिया जाणुन घेतात. नेमके प्रश्न विचारतात. मुद्येसुद चर्चा करतात. आपुलकी आणि शिस्त याचा बरोबर बॅलन्स करतात.
बैठक संपताना चहा आल्यानंतर माझी अस्वस्थता जाणवल्यावर उध्दवजींनी कारण विचारले.” मला शुगर असल्याने मी शक्यतो बिनासाखरेचाच चहा घेतो” असं सहज म्हणताच त्यांनी त्यांचाही चहा परत पाठवला आणि म्हणाले, शशांकजींचा Without sugar चहा देताना मग मलाही द्या. मी त्यांना चहाला कंपनी देतो.” एवढा Respect पाहिल्यावर मनातल्या मनात मला दबंग मधला डायलाॅग आठवला. “थप्पड से डर नहीं लगता साब, लेकीन प्यार से डर लगता है । “
चहा झाल्यावर उध्दवसाहेब एका कार्यक्रमासाठी पुढे जाणार होते. “अनिल, मी आता निघतो. पण पुढच्या तीन प्रशिक्षण शिबिराच्या तारखा, नियोजन याबाबत शशांकजींशी व नितीनजींशी बोलून बाकीचे ठरवुन घे.”
तेवढ्यात आम्हाला आठवले, मित्र नविदभाई पठाण व उमेशजी दुबे यांनाही उध्दवसाहेबांशी भेटायची, बोलायची इच्छा होती. उध्दवजींना तशी विनंती करताच त्यांनी मिलिंद नार्वेकरांकडे निरोप देऊन दोघांनाही आत बोलावले. मग चेंबरच्या बाहेर छायाचित्रकार प्रभाकर वराडकरांनी खच्याक करत फटाफट फोटो टिपले. तसेच नविदभाई व उमेशजींशी चौकशी करत आपुलकीने संवादही साधला.











