बारामती, दि. २३ : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मारक उभारणीच्या प्रस्तावावरून बारामती नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत चांगलीच राजकीय खळबळ उडाली. स्मारकाच्या विषयावर विविध नगरसेवकांनी भूमिका मांडत पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली असताना, प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेवक तथा आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ यांनी काही नगरसेवकांच्या भूमिकेवर थेट प्रश्न उपस्थित करत सभागृहात वातावरण तापविले.
सभेत बोलताना बल्लाळ यांनी अजितदादा पवार यांच्याविरोधात पूर्वी करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा संदर्भ देत काही नगरसेवकांच्या मौनावर टीका केली. “त्या वेळी अजितदादांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या समर्थनार्थ ठामपणे उभे राहणारे फारच कमी होते. नगरसेवक अमर धुमाळ आणि विशाल हिंगणे यांनी त्यावेळी स्पष्ट भूमिका घेतली होती. मात्र आज स्मारकाच्या विषयावर अनेक जण पुढे येताना दिसत आहेत,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी इतर सदस्यांनाही लक्ष्य करत, “जेव्हा अजितदादांबाबत वादग्रस्त वक्तव्य झाले होते, तेव्हा तुम्ही गप्प का बसला होतात? त्यांच्या सन्मानासाठी आवाज का उठवला नाही?” असा थेट सवाल केला.
स्मारक उभारणीसाठी सूचक होण्याची स्पर्धा सुरू असल्याचे सांगत बल्लाळ यांनी काही जण केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी पुढाकार घेत असल्याचा आरोपही केला. “अजितदादांप्रती खरी निष्ठा ही कृतीतून दिसली पाहिजे. केवळ सभागृहातील भाषणे किंवा ठराव मांडून निष्ठा सिद्ध होत नाही,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
बल्लाळ यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. स्मारक उभारणीच्या मुद्द्यावर सुरू झालेली चर्चा पुढे राजकीय भूमिका, निष्ठा आणि कार्यपद्धती यांवर केंद्रित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यांच्या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नव्याने राजकीय चर्चा रंगली असून, बारामतीच्या राजकीय वर्तुळात या विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे.










