घनश्याम केळकर – बारामती
परदेशी जाऊन नोकरी करावी आणि भरपूर पैसे कमवावे अशी अनेक तरुणांची आकांक्षा असते. परंतू यातील अनेक चुकीच्या मार्गाने परदेशात जातात आणि अडकून पडतात. अशा परदेशात त्यांच्या मदतीला कोण येणार ? पण या तरुणांना मदत करण्याचा ध्यास घेतलेले हैद्राबादचे शेख चांद पाशा हे आपले भीमपुत्र आयडॉल २०२५ चे मानकरी आहेत.
१९९० मध्ये स्वत:ची फसवणूक झाल्यानंतर पाशा यांना या प्रश्नाची जाणीव झाली. आखाती देशात आजही लाखो भारतीय काम करतात. आज दोन्ही देशात अनेक करार झालेले आहेत. पण १९९० मध्ये फारच वाईट स्थिती होती. त्यावेळी भारतीय एजंटांनी फसवणूक करून आखाती देशात पाठविलेले तरुण तेथील तुरुंगात खितपत पडायचे. त्यांचे पासपोर्ट काढून घेतले जायचे. अशा तरुणांसाठी शेख चांद पाशा यांनी मोहीम सुरु केली. राजकारणी, माध्यमे यांच्या माध्यमातून या विषयाला तोंड फोडले. राज्य सरकार आणि केंद्र सरकारला याचे गांभिर्य लक्षात आणून दिले.
त्यांच्या या प्रयत्नाचा भाग म्हणून आजअखेर ६ लाख भारतीय परत देशात आले आहेत, जे अवैधरितीने आखाती देशात गेले होते. याखेरीज जे तरुण आखाती देशात असताना त्यांचा मृत्यू होतो, त्यांना भारतात मदत मिळत नव्हती. तेलंगणा सरकारचे अशा तरुणांच्या कुटुंबांना १० लाख रुपये मदत देण्याचे ठरवले. यामागेही पाशा यांचेच प्रयत्न आहेत. अनेकदा तिथे मरण पावलेल्यांचे मृतदेह भारतात आणणे जिकीरीचे होते. या विषयावरही पाशा यांनी काम केले. यासाठीही केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी आता योजना तयार केल्या आहेत. आता हे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोचणे सोपे आणि कमी खर्चाचे झाले आहे.
या सगळ्या कामामध्ये पुर्वीचे आंध्रप्रदेश सरकार आणि आताचे तेलंगणा सरकार, केंद्रातील पुर्वीचे कॉंग्रेस सरकार आणि आताचे भाजपा सरकार यांच्याशी त्यांनी सततचा संपर्क ठेवला. आता केंद्र सरकारने त्यांना आंतराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ता म्हणून मान्यता दिली आहे. अशा अवैध मानवी वाहतुकीच्या क्षेत्रातील एक तज्ञ म्हणून ते आज ओळखले जातात. त्यांचे नोबेल पारितिषिकासाठी नामांकनही झालेले झालेले आहे.
हे आहेत भीमपुत्र आयडॉल २००२५ चे मानकरी डॉ. शेक चांद पाशा. भीमपुत्र आयडॉल २०२५ चा हा कार्यक्रम २० एप्रिल रोजी बारामतीतील गदिमा सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. बारामतीतील संविधान विचार मंचाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भीमपुत्र आयडॉल २०२५ च्या सन्मानमुर्तींची बारामतीकरांशी अधिक चांगली ओळख व्हावी अशी आमची इच्छा आहे. यातून अनेकांना प्रेरणा मिळावी, अनेक प्रकल्प बारामतीत आकारात यावेत हा या सगळ्या उपक्रमामागचा हेतू आहे. यासाठी या सन्मानमुर्तींसोबत गटचर्चा किंवा संस्थेला भेट देण्याबाबतचे नियोजन आम्ही करत आहोत. आपणास या गटचर्चेत सहभागी होण्याची इच्छा असेल किंवा आपल्या संस्थेला भेट द्यायची असेल तर ९८८१०९८१३८ – घनश्याम केळकर या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.











