भिगवण : महान्यूज लाईव्ह
29 वर्षाच्या दुष्काळानंतर गेल्या दोन वर्षापासून राज्यातील सर्वात मोठ्या उजनी धरणामध्ये मत्स्यमित सोडायला सुरुवात झाली आहे. हे मत्स्यबीज सोडले गेले आणि छोट्या माशांच्या मासेमारीवर बंदी घातल्याने देशी प्रजातीच्या दुर्मिळ होत चाललेल्या माशांचे प्रजनन होऊ लागले साहजिकच गेल्या दोन वर्षात पहिल्यांदाच उजनीतील मच्छीमारांच्या जाळ्यात मोठे मोठे देशी मासे सापडू लागले आहेत, मात्र पुन्हा त्याला दृष्ट लावण्याच्या प्रयत असलेल्या फिश माफियाना आज जलसंपदा विभागाने चांगलाच दणका दिला.
गेल्या वर्षी धरणात मत्स्यबीज सोडले होते आणि छोट्या आकाराच्या माशांच्या मासेमारीवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर माशांची वाढ झाली. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून पुन्हा बेकायदेशीरपणे मत्स्यबीज व लहान मासे मारण्याचा सपाटा सुरू राहिल्याने आज जलसंपदा विभागाने तिसरा डोळा उघडला.
शनिवारी दौंड तालुक्यातील खानोटा परिसरातून सकाळच्या वेळी या कारवाईला सुरुवात करण्यात आली लहान आकाराच्या माशांची मासेमारी करणाऱ्या वडपच्या जाळ्यामध्ये नष्ट करण्यात आल्या या मोहिमेमध्ये पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता एन.एम. खाडे, शाखा अभियंता महेश दळवी तसेच आकाश पवार, सचिन ठोंबरे, पल्लवी अंबोरे, ज्योती भिसे यांचे पथक सक्रिय होते.
मत्स्यव्यवसाय विभागाने मत्स्यबीज सोडल्यानंतर किमान दोन वर्षे संवर्धन होण्यासाठी लहान आकाराच्या माशांची मासेमारी करणारे वडापांड्या यांच्यात आधारे मासेमारी अथवा वाहतूक करण्यावर बंदी घालण्याची शिफारस केली आहे. दुसरीकडे ही बंदी असल्यामुळे माशांची संख्या व माशांचे वजन देखील वाढण्यास मदत झाली.
मात्र आता गेल्या काही दिवसांपासून उजनीचे पाणी जसे जसे कमी होऊ लागले आहे, तसतसे पुन्हा सामाजिक हित लक्षात न घेता अधिक नफ्याच्या हव्यासाने वडाप, पंड्याच्या साह्याने मासेमारी सुरू झाली होती. यात परप्रांतीय मच्छीमारही आघाडीवर असल्याने स्थानिक मच्छीमारांच्या हिताला बाधा निर्माण झाली होती त्या पार्श्वभूमीवर जलसंपदा खात्याने तगडे पाऊल उचलल्याने स्थानिक मच्छीमारांनी स्वागत केले आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे जलसंपदा विभागाचे अभियंता खाडे यांनी स्पष्ट केले आहे.
उजनी धरणातील माशांची संख्या व माशांचे प्रमाण 29 वर्षांपूर्वी जसे होते, तसेच होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक समिती स्थापन करण्याची सूचना केली होती. त्यानुसार समिती स्थापनही झाली. मात्र अधिकारीच उदासीन असल्याने फिश माफियांचे धाडस वाढत आहे. या समितीमध्ये उजनी धरणाचे कार्यक्षेत्र असलेल्या इंदापूर दौंड करमाळा कर्जत माढा तालुक्यातील पोलीस अधिकारी तहसीलदार प्रदूषण नियंत्रण मंडळ या तगड्या प्रशासनाचा समावेश आहे. या सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केल्यास उजनीची मत्स्यसंपदा वाढल्याशिवाय राहणार नाही.











