डॉ. संदेश शहा.
भारताच्या जिडीपीमध्ये जैन समाजाचे मोठे योगदान असून देशाच्या ५ ट्रिलियन इकॉनॉमीचा रस्ता जैन समाजातून जातो. भगवान महावीर आणि सर्व तीर्थंकर यांनी दिलेल्या तत्त्वात घेण्यापेक्षा देण्याची भावना आहे. त्यामुळे जैन समाज हा घेणारा समाज नसून देणारा समाज म्हणून ओळखला जातो. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जैन संघटना समर्पण भावनेने काम करत आहे. महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटनेचे अनमोल योगदान असून पाण्याच्या शाश्वत कामामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्या निश्चित थांबतील असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पुणे बिबवेवाडी येथील वर्धमान सांस्कृतिक भवन मध्ये भारतीय जैन संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये जलसंधारण या विषयावर मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी माजी मंत्री चंद्रकांत पाटील, वल्लभ भन्साळी, प्रफुल्ल पारेख, नूतन आमदार माधुरी मिसाळ, बाळासाहेब धोका आदी मान्यवर पहिल्या सत्रात उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात सिने अभिनेता आमीर खान आणि शांतिलाल मुथा यांनी देखील सहभाग घेतला.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारतीय जैन संघटनेने जमीनीवर उतरून सर्व जिव्हाळ्याच्या शक्ती एकत्र करून काम केले आहे. महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशन आणि भारतीय जैन संघटनेने जलसंधारणाचे लोकसहभागातून केलेले काम अनमोल आहे. त्यामुळे समाज परिवर्तन होवून अनेक गावे सुजलाम सुफलाम झाली आहेत. शेतकऱ्यांना या माध्यमातून शाश्वत पाणी उपलब्ध झाल्यास त्यांच्या आत्महत्या देखील थांबण्यास मदत होणार आहे. मूल्य शिक्षणाची पुस्तके तयार करून शालेय शिक्षणात मूल्य शिक्षणाचा प्रयोग राज्यातील सर्व सरकारी शाळेत शांतिलाल मुथा यांनी यशस्वी केला आहे. भारतीय जैन संघटनेचे हे मॉडेल देशभर राबविण्यात येणार आहे. भारतीय जैन संघटनेस सर्वतोपरी मदत करण्यास आपण कटिबध्द असल्याची ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पुढील पाच वर्षांत आमीर खान यांच्या पाणी फाऊंडेशनसोबत जलसंधारणाचे काम करून महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्या साठी बीजेएस पूर्ण ताकदीने काम करेल असा विश्वास भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांनी व्यक्त केला.
यावेळी आमीर खान म्हणाले, पाणी फाऊंडेशनच्या कार्यास देवेंद्र फडणवीस यांनी सुरवातीपासून सहकार्य केले आहे. शाश्वत पाणी हे शेती व्यवसायास संजीवनी देते. त्यामुळे भारतीय जैन संघटना, पाणी फाऊंडेशन लोकसहभागातून महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करण्यासाठी नियोजनबध्द पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे जल व माती संवर्धन याबाबत मोठे काम उभे राहिले आहे. त्यामुळे शेती तसेच शेतकऱ्यांचे देखील सक्षमीकरण होत आहे.











