किरण माने, शिवसेना स्टार प्रचारक
रहिमतपूरला साहेबांच्या सभेला साधारणपणे पंधरा हजार लोक येतील असा अंदाज होता… पस्तीस ते चाळीस हजार लोक आले. साडेपाचची सभा होती. मुसळधार पाऊस सुरू झाला. खराब हवामानामुळे साहेबांचे हेलीकाॅप्टर येऊ शकले नाही. साहेब गडहिंग्लजवरुन ‘बाय रोड’ निघाले. लोक वाट पहात होते. साडेसहा झाले, सात वाजले, आठ वाजले, साडेआठ वाजले… लोक पावसात भिजले, पण जागचे हलत नव्हते. कुठल्याही गाडीचा आवाज आला की ‘पवारसाहेब आले’ असं समजून अख्खा पस्तीस चाळीस हजारांचा माॅब उठून उभा रहायचा. साहेब नाहीत असं कळाल्यावर निराश होऊन खाली बसायचा.
कराड उत्तर मतदारसंघाचे निष्ठावान उमेदवार बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारासाठी मी गेलो होतो. “किरणजी, भुमीपुत्र म्हणून रहिमतपूरकरांचे तुमच्यावर खुप प्रेम आहे. तुमच्या भेटीचा आग्रह आहे. याच.” असा फोन आमचे बंधु आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने यांनी केला. त्यामुळे आनंदानं गेलो. माझं भाषण सुरू असताना हे प्रेम मला स्पष्ट जाणवत होतं. अतिशय मनापास्नं संवाद साधला… या हृदयीचं त्या हृदयी पोचलं. भ्रष्ट गद्दारांच्या मगरमिठीतनं हे राज्य सुटावं ही तळमळ प्रत्येकाच्या मनात आहे हे जाणवलं.
…आता आमच्यासकट सगळ्यांच्या नजरा पवारसाहेबांच्या वाटेवर होत्या.
रात्रीचे दहा वाजत आले. वेळ संपत आली. साहेब रस्त्यातच होते. आता ते सभेला येऊ शकत नाहीत हे स्पष्ट झाले. साहेबांनी गाडीतूनच फोनवरून भाषण केलं. फोन माईकला लावून ते भाषण लोकांनी जीवाचा कान करून ऐकले…सर्वसामान्य जनमानसात साहेबांचा करीश्मा काय आहे ते सगळ्यांनी अनुभवलं!पवारसाहेब, तुम्ही या वयात महाराष्ट्र वाचवण्यासाठी जे कष्ट घेत आहात, ते हा मराठी मुलूख कायम लक्षात ठेवेल.











