राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : पाटस येथील युवकाला पाच लाखांची सुपारी घेऊन अपघात करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना दौंड न्यायालयाने बुधवार (३०) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान,या प्रकरणातील मुख्य सुत्रधार अक्षय बबन कोळेकर हा फरार आहे.
१७ ऑक्टोंबर २०२४ रोजी रात्री पाटस-कानगाव रोडवर पाटस येथील पळसे पुर्नवसन येथे पाटस येथील युवक वैभव दिवेकर याला दुचाकीवरुन घरी जात असताना नंबर नसलेल्या चारचाकी कारने भरधाव वेगात मोटार सायकलला धडक देऊन अपघाताची घटना घडली होती. या अपघातात वैभवच्या दोन्ही खांदयाला, डोक्याला, कपाळास, उजव्या पायास मार लागल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी पाटस पोलीस चौकीला अज्ञान वाहन चालकाच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलीस तपासात हा अपघात नसून अपघाताचा बनाव करून कट रचुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी पोलिसांनी अक्षय गोपीनाथ चव्हाण व सुरज विजय पवार या दोघांना अटक केली होती.
या आरोपींना दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने बुधवार( ३०)पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पाच लाखांची सुपारी देणारा मुख्य आरोपी व सुत्रधार अक्षय बबन कोळेकर, तुषार चोरमले, भिगवण येथील लाला पाटील हे तिघेजण पोलीसांच्या हाताला लागले नाहीत. ते अद्याप फरार असून पोलीसांना गुंगारा देत आहेत.
पोलीस उर्वरित आरोपींना अटक का करीत नाहीत? याबाबत पाटस परिसरात उलटसुलट चर्चा असून पोलिसांनी या आरोपींना त्वरित अटक करावी अशी मागणी आता होत आहे. दरम्यान याबाबत तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांना विचारले असता, दोन आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे. उर्वरित तीन आरोपी फरार असून लवकरच अटक केली जाईल. तपास सुरू आहे असे पोलिसांनी सांगितले.











