जालना : महान्यूज लाईव्ह
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसत आहेत. 29 सप्टेंबर पासून मनोजरांगे पुन्हा उपोषणाला बसणार असून, यावेळी भाजपचे सगळे आमदार पाडणार असा निर्धार जरांगे यांनी केला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य करीत इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी मध्ये घेतलेल्या बैठकीत सांगितले, 29 सप्टेंबर पर्यंत सरकारला वेळ देऊ. हा एक महिना सरकारला वेळ पुरेसा आहे. त्यानंतर अख्खा महाराष्ट्रातील मराठा उपोषणाला बसेल. 29 सप्टेंबर ही उपोषणाची तारीख बदलणार नाही. याकरता मुंबईला जावं लागलं, तरी जाऊ, पण आरक्षण घेऊ. मात्र तिथे जाऊन काही होणार नाही. हे सरकार निवडणुका जवळ आले की आपला फायदा बघते. आता ते काय करतात ते पाहू, पण यावेळी भाजपचे सगळे आमदार पाडू.
त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला. ते म्हणाले, ही आरपारची लढाई आहे. देवेंद्र फडणवीस यांची जिरवायची आहे. बघू या देवेंद्र फडणवीसला मराठा समाजाला बद्दल माया आहे की नाही? देवेंद्र फडणवीस माझ्या नादाला लागू नको. मी तुझा शत्रू नाही, जर मला तुरुंगात टाकलं, तर नागपूरची जागा येणार नाही हे लक्षात ठेव. आता आरपारची लढाई आहे. मी उपोषणाला तर बसणारच आहे, पण ही लढाई जिंकायची आहे. या सरकारला आपल्याला खाली आणायचे आहे. त्यांना दाखवून द्यायचे आहे.











