बारामती : महान्यूज लाईव्ह
शिवस्वराज्य यात्रा बारामतीत आल्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर पलटवार करण्याची संधी सोडली नाही. लोकसभा निवडणुकीच्या काळात प्रचार करताना अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावर चारोळ्यांच्या माध्यमातून अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर शरसंधान साधले.
बारामतीत शिवस्वराज्य यात्रेच्या दरम्यान अमोल कोल्हे बोलत होते. त्यांनी एक चारोळी म्हटली, ती अशी होती, किती दमदाटी केली, तरी लोक आता बधत नाही. बघतो तुला, बघून घेतो स्वाभिमानाला आमच्या खपत नाही. वस्तु चोरली, रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही. स्वार्थासाठी बाप बदलला, तर जनतेला ते पटत नाही…!
बारामतीत लाडक्या बहिणीच्या योजनेसंदर्भात बोलताना अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर शाब्दिक बाण सोडले. ते म्हणाले, सध्या काही योजनांचा उहापोह सुरू आहे. मात्र लाडकी बहीण योजनेची फोड बारामतीकरांसारखी कोणीही करू शकणार नाही. नऊ वर्ष भाऊ रोज दारावरून जातो, पण कधीच घराकडे वळला नाही. पण अचानक भाऊ दारात आला आणि म्हणाला रक्षाबंधन करतो, ओवाळणी घालतो. लोकसभा निवडणुकीपूर्वी बहीण लाडकी नव्हती. निवडणुकीनंतर हा निर्णय घ्यावा लागत असेल, तर परिस्थिती काय आहे हे समजून घ्यावे.
कोल्हे म्हणाले, स्वार्थासाठी बाप बदलला तर काय होते हे बारामतीकरांनी लोकसभेला दाखवून दिले आहे. आता विधानसभेची वेळ आहे. त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आहे. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यातच नव्हे, तर देशातही सरकार बदलणार आहे. त्यामुळे लोकसभेसारखेच काम आपल्याला विधानसभेतही करायचे आहे. आम्हाला कायम आवाजाचा दरारा राखण्याची सवय होती. पण या वाघाच्या आवाजाचं आता म्याऊ म्याऊ झालय की काय कळेना झाले, अशी टीका अजित पवारांवर कोल्हे यांनी केली.











