इंदापूर तालुक्यातील सणसर व कळंब ही गावे राजकीय दृष्ट्या संवेदनशील असून, अर्ध्या तालुक्याशी ही गावे जोडलेली असून या गावात गेल्या काही दिवसांपासून ठाण मांडून बसलेला लाचखोर मंडल अधिकारी ज्ञानोबा विश्वंभर कावळे हा अनेक जणांच्या रडारवर होता. गेल्या काही महिन्यांपासून अनेक जण संधी शोधत होते, मात्र ती संधी सापडली नाही. आज मात्र शिंदेवाडीच्या बहाद्दराने या लाचखोराला जाळ्यात पकडले. तो सुद्धा फक्त दोनशे रुपयांसाठी! आणि त्यातही 66 वर्षाच्या महिलेला विभक्त शिधापत्रिकेची ना हरकत देण्यासाठी या लाचखोराने पैसे मागितले.
सणसरच्या आसपासच्या महसुली गावातील गोरगरीब शेतकऱ्यांना सातत्याने अडवणूक करणारा व पैशाशिवाय कोणतीही काम न करणारा मंडलाधिकारी आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तावडीत सापडला. खरे तर या लाचखोरीमुळे शेतकरी प्रचंड त्रस्त झाले होते. आज तो एसीबीच्या जाळ्यात सापडताच शेतकऱ्यांनी अगदी आनंदोत्सव साजरा केला.
फक्त शिधापत्रिका विभक्त करण्याच्या मागणीचा अर्ज तक्रारदाराने इंदापूरच्या तहसीलदाराकडे दिला होता. मंडलाधिकारी कावळे याच्याकडे सणसर आणि कळंब याचा अतिरिक्त कार्यभार असल्याने या मंडलांतर्गत येणारी अनेक गावे त्याच्याकडे होती. तलाठ्याकडून आलेला शिधापत्रिका देण्यास हरकत नसल्याचा अहवाल कावळे याला फक्त पुढे पाठवायचा होता, पण त्यात सुद्धा कावळे याने दोनशे रुपयाची लाच मागितली.
66 वर्षाच्या वयोवृद्ध महिलेला या मंडळ अधिकाऱ्याने लाच मागितली. ही लाच देण्याची इच्छा नसल्याने या वयोवृद्ध महिलेच्या मुलाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली, या तक्रारीनुसार पडताळणी करण्यात आली, तेव्हा शासकीय पंचांसह केलेल्या पडताळणीत कावळे याने पैसे मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दोनशे रुपयांची लाच स्वीकारताना कावळे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
लाचखोर महसुली कर्मचाऱ्यांच्या हरामीपणामुळे चांगल्या कर्मचाऱ्यांनाही बट्टा लागतो. इंदापूर तालुक्यात चांगले काम करणारेही महसुली कर्मचारी आहेत, पण काहीजण पैशाला एवढी हपापलेले आहेत की, त्यांना समोरच्या शेतकऱ्याची परिस्थिती देखील कळत नाही. अशा कर्मचाऱ्यांमुळे सर्वसामान्य शेतकरी, लाभार्थी प्रचंड त्रस्त आहेत. वाढत्या लाचखोरीकडे कोणाचेच गांभीर्याने लक्ष नाही.











