नेते कुठे गेले कळत नाही,मलिदा गँग बाजूला झाली असे म्हणतात,भाग्य माझं की, देशाचा प्रधानमंत्री आज निम्म्या वेळेला माझं नाव घेतो ही काय साधीसुधी गोष्ट आहे का? शरद पवार
विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
काटेवाडी : शरद पवार यांनी आज काटेवाडीतील ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी काटेवाडीतील ग्रामस्थांनी शरद पवार यांचे जल्लोषात स्वागत केले.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, काही लोक दिसत नाहीत. मी गेले दोन दिवस बारामती तालुक्याचा दौरा करत आहे. माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे, मी गेलो तर अनेक लोक त्या ठिकाणी येतात, सगळे नेते असतात.आता या निवडणुकीत मी जातोय, सगळीकडे नव्या पिढीची, गरिबांची, सामान्य लोकांची गर्दी दिसते, पण नेते दिसत नाहीत. आता नेते कुठे गेले कळत नाही, मलिदा गँग बाजूला झाली असे हे म्हणतात. पण जिथे मलीदा गॅंगचा जे काही उद्योग असतील, ते कुणाचेही असो त्यांना त्यांची जागा दाखवू असे शरद पवार म्हणाले..
शरद पवार पुढे म्हणाले,या लोकसभा निवडणुकीत एक प्रकारची शक्ती दिल्ली पासून लावली. देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्रात आले, माळशिरस तालुक्यामध्ये, कराडला, अहमदनगरला, नाशिकला, नागपूरला, औरंगाबाद अशा १८ ठिकाणी ते आले, त्या १८ पैकी आठ की नऊ ठिकाणी निवडणुकीचा एकच विषय होता शरद पवार..! माझं भाग्य की, देशाचा प्रधानमंत्री आज निम्म्या वेळेला माझं नाव घेतो काय साधीसुधी गोष्ट आहे का?
काटेवाडीचा चमत्कार त्यांना कळला आणि म्हणून कुठेही गेले तर ते माझ्याबद्दल बोलत होते. एका ठिकाणी मी सांगितलं की इथून पुढच्या निवडणुका असतील, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही आमच्याकडे जास्त लक्ष ठेवा. कारण त्यांनी लक्षात ठेवलं, टीका टिप्पणी केली तर मतं उलटी होतात, ते आपण या निवडणुकीत पाहिलं. असा या लोकसभा निवडणुकीतील अनुभवही शरद पवार यांनी सांगितला.











