अजित पवारांची वरवंड च्या सांगता सभेत सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका!
राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : बारामतीच्या खासदारांना तीन वेळा मीच निवडून आणले आहे. मात्र बारामती मतदारसंघाचा विकास त्यांनी केला नाही. बारामती मतदारसंघाचा राज्यातून निधी आणुन मीच विकास केला आहे. तिला शेतीचे काय कळतंय? कधी शेती बघितली आहे का ? धरणात किती पाणी असते हे माहिती आहे का? अशी बोचरी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता वरवंडच्या सांगता सभेत केली. सुळे यांच्यावर टिका करताना मात्र दुसरीकडे अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे तोंड भरून कौतुक केले.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा रविवारी (दि ५) दौंड तालुक्यातील वरवंड येथे पार पडली. या सभेत बोलताना पवार यांनी विरोधकांवर टीका करत अनेक खुलासे केले. दरम्यान, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांची या सभेत उपस्थिती नसल्याने हा तालुक्यात चर्चेचा विषय ठरला.
यावेळी उपस्थितांना त्यांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सत्तेसाठी आणि पदासाठी महायुतीत गेलो नाही, मला उपमुख्यमंत्री पदाच्या लोभासाठी ही गेलो नाही. बारामती मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. शेवटच्या घटकांना न्याय द्यायचा आहे. लोकांची विकास कामे करायची आहेत या लोभासाठी मी महायुतीत गेलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी शेतकऱ्यांसाठी चांगली कामे केली आहेत.
शेतकऱ्यांच्या ऊसाच्या एफआरपीला चांगला बाजारभाव दिला आहे. काँग्रेस सरकारने दखल न घेतल्याने इन्कम टॅक्समुळे पंचवीस हजार कोटींचा भुर्दंड बसला आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी आम्हाला केंद्राचा निधी देण्याचा आणि विकास कामे करण्याचे आश्वासन दिले आहे. मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर गोरगरिबांना तीन कोटी गरीब बांधणार आहेत. असे माहिती पवार यांनी यावेळी बोलताना दिली.
पुढे ते म्हणाले की, आताच्या खासदारांनी तीन वेळा निवडून येऊनही काही केले नाही. ते सोन्याच्या चमच्या तोंडात घेऊन जन्माला आले आहेत. मी पाणी अडवणार अशी टीका करतेत, पण मी कशाला पाणी आडवु? त्यांना पाणी कुठे असते, ते माहित आहे का ? कधी शेती बघितली आहे का? त्या लहान होत्या, तेव्हा ज्वारीला मका, तर गहु आहे की तांदूळ आहे हे सांगता येत नव्हते. मला भावकीबाबत काहीच बोलायचं नाही. महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या. दौंड तालुका सुजलाम सुफलाम करतो. बारामती नंतर दौंड विकास कामांत एक नंबरवर असेल असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दौंड करांनी दिले..
महेश भागवत बाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट!
या सभेत अजित पवारांनी दौंडच्या उमेदवाराला मते देऊन आपली मते वाया घालवू नका, ते काय निवडून येऊ शकत नाहीत. त्यांच्याशी चर्चा केली, पण त्यांची अपेक्षा मोठी होती. त्यांना डायरेक्टर करू, बँकेचे चेअरमन करतो, महामंडळ देतो, उमेदवारी अर्ज माघारी घ्या म्हणालो, पण त्याची लयच मोठी अपेक्षा होती असा गौप्यस्फोट पवार यांनी हात जोडून ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार महेश भागवत यांचे नाव न घेता या सभेत बोलताना केला.
याप्रसंगी आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुल, दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, नागसेन धेंडे, जितेंद्र बडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











