शिरूर : महान्यूज लाईव्ह
स्व. माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांची मला प्रत्येक निवडणुकीत नेहमी मोलाची साथ लाभली. शिरूर तालुक्यात काम करत असताना नेहमी आम्हाला संताजी धनाजी ची जोडी म्हणून ओळखले जात होते. त्यांची उणीव नेहमी भासत राहील अशी भावना माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.
शिरूर येथील स्व.माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या शक्तिस्थळ येथील स्मारकास भेट देऊन आढळराव पाटील यांनी अभिवादन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, स्व.बाबुराव पाचर्णे यांनी आयुष्यभर संघर्ष केला. विकासकामे करताना, लोकांचा संचय करताना त्यांना मी पाहिलंय. लोकं जमविण्याचा त्यांना छंद होता.
छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ चांगले व्हावे यासाठी त्यांनी स्वप्न पाहिले होते. समाधीस्थळ विकासासाठी प्रथम आराखडा आम्हा दोघांनी तयार केला होता. वेळोवेळी त्यास गती देण्याचे काम केले.आज यास मोठा निधी मंजूर झाला असून त्याचे श्रेय केवळ स्व.आमदार बाबुराव पाचर्णे यांचेच आहे.
शांत स्वभावाचे काम करणारा माणूस अशी ओळख असलेले लोकनेते आज हयात नाहीत.आज शक्तिस्थळ वरून प्रेरणा घेऊन शिरूर तालुक्यातून प्रचाराला सुरुवात केली असून यातून प्रेरणा घेऊन आशीर्वाद पाठीशी असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल पाचर्णे, सुधीर फराटे, भाजपा नेते धर्मेंद्र खांडरे, तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुकाप्रमुख रविंद्र काळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, निवृत्तीअण्णा गवारी, दादा पाटील फराटे, कैलास सोनवणे, नितीन पाचर्णे, रामभाऊ सासवडे, श्रुतिका झांबरे, अमोल वरपे, रामभाऊ कदम, स्वप्नील ढमढेरे, बाबासाहेब फराटे, शरद कालेवार, अनघा पाठक, निलेश नवले, राजेंद्र गावडे, तज्ञिका कर्डिले, मयूर थोरात आदी उपस्थित होते.











