सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर तालुक्यात भाजप व राष्ट्रवादी मध्ये मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरू असतानाच आता हर्षवर्धन पाटलांच्या एका लेटरबॉम्ब मुळे महायुतीच्या युतीधर्मामध्ये मिठाचा खडा पडण्याची चिन्हे आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री व मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून इंदापूर तालुक्यात मित्र पक्षाचे पदाधिकारी शिवराळ भाषेत, बेताल वक्तव्य करत आहेत तसेच धमकी देत आहेत अशी भीती व्यक्त केली आहे.

दरम्यान हे पत्र दोन मार्च 2024 रोजी त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना लिहिले आहे, परंतु काल म्हणजे रविवारी हर्षवर्धन पाटील यांची एका विवाह समारंभ मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी भेट झाली. यानंतर आज त्यांनी हे पत्र प्रसिद्धीस दिले आहे. यामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून वरील भीती व्यक्त केली आहे.

या पत्रामध्ये हर्षवर्धन पाटील म्हणतात, राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने कामकाज करत आहे, परंतु माझ्या तालुक्यांमध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असताना इंदापूर मधील मित्र पक्षाचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मिळावे व सभांमधून माझ्यावर अतिशय खालच्या पातळीवर एकेरी व शिवीगाळ भाषेत बेताल वक्तव्य करत आहेत.
त्याचबरोबर तालुक्यांमध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत, त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून आपण यामध्ये तात्काळ लक्ष घालावे. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालण्याची आवश्यकता आहे, तरी आपण याबाबत ठोस भूमिका घेऊन योग्य ती कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावे ही विनंती, अशा स्वरूपाचे पत्र हर्षवर्धन पाटील यांनी लिहिले आहे.
दरम्यान इंदापूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षामधून विस्तवही जात नाही. मात्र येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचा धर्म म्हणून दोघांना एकत्र यावे लागणार आहे. अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांनी मात्र अशा एकीकरणाला विरोध केला असतानाच आता हर्षवर्धन पाटील यांच्या लेटरबॉम्ब ने या महायुती धर्मावर मिठाचा खडा पडणार का? अशा स्वरूपाचे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दुसरीकडे अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी इंदापूर येथे झालेल्या मेळाव्यामध्ये मित्र पक्षाला सामावून घ्या, तसेच त्यांच्यावर कोणतीही बेताल वक्तव्य करू नका, सांभाळून घ्या अशा स्वरूपाचे वक्तव्य केले होते, मात्र त्यानंतरही फरक पडला नसल्याचे चित्र यामध्ये दिसत असून हर्षवर्धन पाटील यांचा लेटरबॉम्ब हा महायुतीच्या इंदापुरातील एकीकरणाला बांध घालेल काय? अशा स्वरूपाचा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.











