विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात आपल्या माळेगाव, सोमेश्वर कारखान्याची उदाहरणे दिली. तिथे एफआरपी पेक्षा कसा जास्त भाव देतात आणि तुम्ही का नाही? असे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलताना म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पणदरे येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप, माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, यंदाच्या वर्षी साखर कारखाने सुरू होत असताना उशिरा सुरू झाले. यंदाच्या वर्षी ऊस कमी आहे. असं साखर कारखाना संघाने आम्हाला सांगितलं. त्यामुळे १५ ऑक्टोबरला कारखाने सुरू करायला परवानगी देऊ नका हे साखर संघाने सांगितल्यावर ते आम्ही मान्य केलं. कारखाने सुरू दिवाळीनंतर झाले.
आमच्या सगळ्यांचा अंदाज चुकला. कोणालाच खरं वाटलं नाही. साखर आयुक्तालयाचा अंदाज चुकला. कोल्हापूर परिसरामध्ये आंदोलन चाललेली होती. शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी तर माळेगाव सोमेश्वर ची उदाहरणे दिली तिथे एफआरपीपेक्षा कसा जास्त भाव देतात आणि तुम्ही का नाही? असे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलताना म्हणाले.
यावेळी जास्तीत जास्त टनेज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यातील बरेच शेतकरी सभासद ८६०३२ लागण करतात. काही ठिबकने तर काही पाटपाण्याने ऊस पीक आणतात. पण ते कष्ट घेतात हे अभिमानास्पद आहे. या बहाद्दर शेतकऱ्यांनी काळ्या आईची सेवा करत असताना उत्तम प्रकारे टनेज काढण्याचे काम केले. जवळपास ९० मॅट्रिक टनापासून १३७ मेट्रिक टनापर्यंत उत्पादन घेतले. त्यांनी कष्ट घेतले असे सांगत जास्तीत जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे अजित पवार यांनी कौतुक केले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, सन २०१६-१७ साली २९ टन, २०१७-१८ मध्ये ३७ टन २०१८-१९ मध्ये ३५ टन, २०१९- २० मध्ये ३० टन, २०२०-२१ मध्ये ४० टन, २०२१-२२ मध्ये ३७ टन, २०२२-२३ मध्ये ३६ टन आणि ह्या वेळेस तर ४७ टन एकरी उत्पादन घेतले.
मला यंदा असं वाटलं तर पाऊस काळ कमी झाला आहे. धरणाची परिस्थिती दरवर्षी सारखी नाही. आता उजनी धरण उणे दहा टक्के आहे. गेल्या वर्षी उजनी धरण ६० ते ६५ टक्के होतं. ही परिस्थिती आहे. पाऊस काय जेवढा पडायचा तेवढा पडला नाही. हा सगळ्यांनी अनुभव घेतला तरी देखील शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळालं आहे. त्या पाण्याचा शेतकऱ्यांनी विनीयोग केला.
आता नवीन नवीन गोष्टी होताहेत. आता द्रवरूप युरिया मिळतो. आता ठिबकने थेट पाण्यातून खते देतात. या सगळ्या गोष्टींचा बदल झाला. पूर्वी आपण पाचट जाळायचो आता पाचट जाळत नाही. आता आपण पाचटकुटी करतो. त्याच्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो. मी सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांना सांगितले एक टन सुद्धा गेटकन घेऊ नका. त्यांनी पूर्ण गेटकेन बंद केलेला आहे.
माळेगावला मात्र तसं नाही. माळेगावला काही प्रमाणात गेटकन घेतल्याशिवाय त्याबाबतीमध्ये चालणार नाही, कारण माळेगावचे कार्यक्षेत्र फार थोडे आहे. गेटकेन नाही घेतला, तर आपला कारखाना लवकर बंद होईल. माझी पण पोल्ट्री, डेअरी, उसाची शेती फळबागा आहेत. मला पण शेतीची आवड आहे. परंतु आता तुम्ही जबाबदारी टाकल्यावर आपल्याला तिथे तेवढा वेळ देता येत नाही असे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना अजित पवार म्हणाले.











