मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन पाण्याचे नियोजन करावे, अशी खासदार सुळेंची मागणी
बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच तालुक्यांमध्ये पाण्याचा प्रश्न हळूहळू गंभीर होत चालला आहे. यामुळे तातडीने पाण्याच्या संदर्भाने दुष्काळी आढावा बैठक घेण्याची आवश्यकता आहे, तरी तातडीने बैठकी घेऊन पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे केली आहे.
खासदार सुळे यांनी याबाबत ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे. दुष्काळी आढावा बैठकीत पिण्याचे तसेच शेती आणि जनावरांच्या पाण्यासाठीचे नियोजन करणे आवश्यक आहे. तरी मुख्यमंत्र्यांनी याबाबत वैयक्तिक लक्ष देऊन उपमुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत तातडीने या बैठकीचे आयोजन करावे, असे त्यांनी पुढे नमूद केले आहे.











