राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : ओबीसी का नारा है, सो में से साठ हमारा है, ओबीसी पर्व, बहुजन पर्व अशी घोषणा देत ओबीसी, एससी, एसटी आणि मुस्लिम समाजाने एकत्रीत ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी आरपार ची लढाई लढण्याचा निर्धार चौफुला येथे पार पडलेल्या बहुजन महामेळाव्यात करण्यात आला.
दौंड तालुक्यातील चौफुला ( बोरीपार्धी ) येथे बुधवारी ( दि ८) ओबीसी,एससी, एसटी आणि मुस्लिम समाजाचा भव्य बहुजन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात आमचा आतापर्यंत कोणाच्याही आरक्षणाला कधीच विरोध नाही, मात्र आमच्या आरक्षणात कोणी दबाव आणून संविधानाने दिलेले आरक्षण असंविधानिक मार्गाने घुसखोरी करून जर घेत असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही.
राज्य सरकारने कोणताही निर्णय कोणाच्या दबावाखाली घेऊ नये, आततायी करू नये, ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे संरक्षण करावे , अन्यथा ओबीसी, एससी, एसटी आणि मुस्लिम समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल. आणि याची सुरुवात दौंड तालुक्यातुन होईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
आमचे आंदोलन कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही पण आमच्या हक्काच्या आरक्षणाचे संरक्षण आम्हाला करावे लागणार आहे. आमच्या आरक्षणाबद्दल असेल तर आम्ही ते रोखू. राज्य आणि केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करावे. अन्यथा सरकारला वाईट परिणाम भोगावे लागतील असा विचार यावेळी बोलताना अनेक व्यक्त्यांनी आपल्या भाषणात दिला.
सरसकट कुणबीचे दाखले दिले, तर भविष्यात मूळ ओबीसी समाजाचा साधा चपराशीही होणार नाही आणि कोणत्याही शासकीय, निमशासकीय कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारीही दिसणार नाहीत अशी भीती यावेळी व्यक्त करण्यात आली. मराठा समाज हा ओबीसी कधीच नव्हता आणि पश्चिम महाराष्ट्रात तर एकही कुणबी नाही. खोटे पुरावे गोळा करून आणि खोटे कुणबी दाखले घेऊन ओबीसींच्या ताटातले आरक्षण लाटण्याचे काम सध्या चालू आहे, राज्य शासनाने आतापर्यंत नेमलेला आठ आयोगामध्ये एकही ओबीसी आणि मागासवर्गीय नाही. असा आरोप यावेळी करण्यात आला.
सरसकट कुणबी दाखल्यामुळे ओबीसींचे आरक्षण शुन्यावर आले आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिलेले ओबीसींच्या हक्काचे आरक्षण टिकवण्यासाठी आता संघर्षाशिवाय पर्याय नाही. दौंड तालुक्यात ओबीसी, एससी, एसटी आणि मुस्लिम समाजाची लोकसंख्या जास्त आहे. दिवाळीच्या पाडव्याला जेजुरीच्या मल्हार मार्तंड च्या चरणी जाऊन सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या पदाचे राजीनामा देतील आणि पुढील पाच वर्षात ज्या ज्या आगामी निवडणुका होतील त्या निवडणुकीत फक्त ओबीसी एसटी आणि मुस्लिम समाजाच्या उमेदवाराशिवाय इतर कोणाला ही मतदान न करण्याची शपथ घेणार असल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
दिवाळीनंतर पन्नास हजारांच्या आसपास भव्य बहुजनांचा मोर्चा दौंड तहसीलदार आणि प्रांत कार्यालयवर काढण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली. या प्रसंगी ऍड दौलत ठोंबरे, ऍड यशवंत शिंदे, महेश भागवत , पांडुरंग मेरगळ, बाळासाहेब कापरे, बादशाहभाई शेख, शुभांगी धायगुडे, सपना माळी, गौरी पिंगळे, बाळासाहेब तोंडे पाटील ,श्रीकृष्ण मोरे, स्वप्निल भागवत आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव गायकवाड, महाराष्ट्र झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष दत्ताभाऊ डाडर, नाभिक संघटनेचे अध्यक्ष गणेश सांळुखे, सारिका भुजबळ, जयश्री भागवत, डी. डी. बारवकर, अनिकेत भागवत, मंगेश रायकर, संजय पवार आदींसह या मेळाव्यास दौंड तालुक्यातील ओबीसी, एससी, एसटी आणि मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.











