इंदापूर : महान्यूज लाईव्ह
छत्रपती सहकारी साखर कारखाना 2023 24 च्या गळीत हंगामासाठी ऊस उत्पादकांना पहिला हप्ता प्रतिज्ञा 2900 देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी दिली.
यावर्षी छत्रपती कारखान्याचा पहिला हप्ता किती? हा प्रश्न बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमात विचारला गेला, मात्र यावर्षी छत्रपती कारखाना सभासदांना योग्य भाव देईल असे सूतोवाच व संकेत कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी याच कार्यक्रमात दिले होते. आज त्यांनी वरील माहिती देत छत्रपती कारखाना इतर कारखान्यांच्या बरोबरीनेच भाव देणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षीच्या हंगामात छत्रपती कारखाना अंदाजे आठ लाख टन कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप करेल व कार्यक्षेत्राबाहेरील दोन ते सव्वा दोन लाख टन गाळपासाठी घेऊन एकूण हंगामात सव्वा दहा लाख टन गाळप करेल अशा स्वरूपाची नियोजन केले आहे.
कारखान्याने विस्तारवाढ, सहवीजनिर्मिती प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जातून कारखाना लवकरच बाहेर पडणार आहे, मात्र काही सभासद इतर कारखान्यांकडून जादा दर मिळेल या अपेक्षेवर बाहेर ऊस देऊ देण्याचा प्रयत्न करू पाहत आहेत. कारखान्याने सव्वा दहा लाख टन गाळप गृहीत धरून ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा यांच्याशी करार केलेला आहे, तसेच कारखान्यातील मशिनरी रिपेअरिंग व ओव्हरऑईलिंग इत्यादीसाठी खर्च केलेला आहे.
अशा परिस्थितीत कार्यक्षेत्राबाहेरील ऊस बाहेर गेला तर कारखान्याचे गाळप कमी होऊन मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. सभासदांच्या मालकीची ही संस्था टिकावी यासाठी सर्वच सभासदांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सभासदांनी या गाळप हंगामात त्यांचा इतर कारखान्यांना गळितास न देता आपल्याच कारखान्यास गाळपास द्यावा. जास्तीचे गाळप झाले तर साखर व मळीचे उत्पादन तसेच वीज निर्मितीमध्ये वाढ होणार आहे, पर्यायाने कारखान्याच्या उत्पन्नात वाढ होऊन कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे सभासदांना आणखी ऊस दर वाढवून देणे शक्य होणार आहे.
हा इतिहास ताजा; सभासदांनी त्याचा विचार करावा!
या गळीत हंगामाच्या दृष्टीने प्रशांत काटे व अमोल पाटील यांनी एक महत्त्वाचे आवाहन व महत्त्वाची गोष्ट नमूद केली आहे. ती म्हणजे गेल्या चार वर्षांमध्ये छत्रपती कारखान्याने सभासद व गेटकेनधारकांमध्ये कधीही दुजाभाव केला नाही. याच छत्रपती कारखान्याचा हाही इतिहास आहे की, ज्यावेळी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अतिरिक्त ऊस शिल्लक होता, गाळप करणे शक्य झाले नाही, त्यावेळी छत्रपती कारखान्याने तोटा असून सभासदांच्या संपूर्ण उसाचे गाळप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा इतिहास ताजा असल्याने छत्रपती कारखाना हा सभासदांच्या किती हिताची जपणूक करतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
दुसरीकडे ज्यावेळी सर्वच कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अतिरिक्त ऊस होईल, त्यावेळी इतर कारखाने आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस गाळपास नेणार नाहीत. तेव्हा आपलाच कारखाना सभासदांच्या संपूर्ण उसाचे गाळप करणार आहे. त्यामुळे सभासदांनी चालू गळीत हंगामापुरता विचार न करता आपल्याच कारखान्याला गळीतास द्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावर्षीची परिस्थिती वेगळी आहे. उसाची उपलब्ध कमी असून कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आवश्यक एवढे गाळप करणे कारखान्यासाठी गरजेचे आहे. छत्रपती कारखाना यावर्षी अपेक्षित गाळप करू शकला तर आर्थिक संकट जे पुढे आहे त्यातून सहजपणे मात करू शकतो याचा आम्हाला विश्वास आहे आणि याच छत्रपती कारखान्यावरती सभासदांचाही पुरेपूर विश्वास आहे याची आम्हाला खात्री आहे. फक्त हा विश्वास वृद्धिंगत करण्यासाठी सभासदांनी फक्त छत्रपती कारखान्यालाच ऊस द्यावा.
येणाऱ्या काळामध्ये आपण या संकटातून मात करून राज्यातील प्रथम क्रमांकाचा कारखाना अशी आपली ओळख आपण निर्माण करण्यासाठी सक्षम होऊ याची खात्री आम्ही तुम्हाला देतो. या छत्रपती कारखान्याचा पूर्वीचाच नावलौकिक जपण्यासाठी हा हंगाम सक्षमपणे पार पाडण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठीच सभासद सहकार्य करतील असा आम्हाला विश्वास आहे असे त्यांनी सांगितले.











