संपादकीय
गेली अनेक दिवस शांततेत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला काल बीडमध्ये हिंसक वळण लागले. तसेही मंगेश साबळे यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्या फोडल्यानंतर या आंदोलनाला अशा प्रकारचे वळण लागण्यास सुरुवात झालीच होती, मात्र काल अनेक बिन चेहऱ्याची माणसं आंदोलनात घुसली आणि नेमकी विरोधकांचीच कार्यालय घर टार्गेट केली गेली.
यावरून मनोज जरांगे पाटील यांनी देखील सत्ताधाऱ्यांकडून अशा प्रकारचा हिंसाचार करवला जात असल्याची शंका व्यक्त केली, पण त्याहीपेक्षा अत्यंत गंभीर गोष्ट म्हणजे संघर्ष जिंकण्याच्या स्थितीवर असताना तहात हरण्याची वेळ येऊ शकते तेव्हा मराठ्यांनो सावध राहा..!
जेव्हा आंदोलन अहिंसक असते, तेव्हा ते मोडून काढणे सरकारला अवघड जाते. एक अहिंसक माणूस सरकारला जड जातो. गेल्या काही दिवसात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन दडपण्याची सरकारला संधीच नव्हती, मात्र काल अचानक जाळपोळीला सुरुवात करून काहीजणांनी सरकारच्या दडपशाहीला आमंत्रण दिले आहे.
विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार, अंबादास दानवे, आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादीचे बीड मधील शरद पवार गटाचे कार्यालय अजित पवार गटाच्या जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालय, दिलीप वळसे पाटील यांचे फ्लेक्स बोर्ड सुरुवातीला लक्ष्य करण्याचे कारण यामागे दडल्याचे बोलले जात आहे.
ही जाळपोळ का?
जाळपोळ करणाऱ्यांमधील सुरुवात करणारे लोक हे जाणीवपूर्वक अशा प्रकारचा हिंसाचार सुरू करत आहेत आणि अस्वस्थ असलेली मराठा तरुणांची मानसिकता अशा हिंसाचाराला आपोआपच प्रोत्साहन देत असून हातात दगड घेत आहेत. यामध्ये मनोज जरांगे यांच्या विषयीची आत्मीयता आणि मराठा आरक्षणाची अस्वस्थता यापेक्षाही आपण काहीतरी उद्रेक घडवू शकतो हीच यामागील सर्वाधिक मोठी विकृत मानसिकता आहे आणि सरकारला हेच हवे आहे.
सरकारला मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन संपवणे आवाक्याच्या पलीकडचे असल्यानेच आता या आंदोलनामध्ये हिंसाचाराचा विकृत मेंदू घुसवला जाऊ शकतो, नव्हे त्याची सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्या जिल्ह्यातील आणि तालुक्या तालुक्यातील मराठा तरुणांनी सावध राहायला हवे. काळरात्र झालीच होती, मशाली पेटल्याच आहेत, परंतु या मशालीमध्ये जनजागृती करण्याऐवजी घराघरांमध्ये वणवा भडकवण्याचा प्रयत्न होत असेल, तर मराठ्यांनी सावध राहायला हवे. रात्र वैऱ्याची आहे.
माळेगावमध्ये मराठा समाजाने संवेदनशीलता आणि तत्परता दाखवली!
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या उसाच्या गळीत हंगामाच्या मुळीपूजनासाठी अजित पवार येऊ नयेत यासाठी मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मात्र हे आंदोलन अतिशय शांततेने करण्यात आले. आंदोलन करताना ज्यावेळी संचालक मंडळ भेटायला आले.
त्यावेळी सकल मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांनी कोणीही या जागेवरून उठणार नाही, आपल्या आंदोलनामध्ये कोणीतरी मराठा असल्याचे भासवून समाजकंटक घुसू शकतो आणि तो चुकीचे कृत्य करू शकतो. त्यामुळे इथून कोणीही हलणार नाही. अशा स्वरूपाचा आक्रमक पवित्रा मराठा आंदोलकांना घालून दिला होता.
खरोखरच जागेवरून कोणीही मराठा आंदोलक हलले नाहीत. शांततापूर्ण परंतु संघर्षमय वातावरणात झालेल्या या आंदोलनाची सरशी अखेर मराठा आंदोलकांची झाली आणि अजित पवार आलेच नाहीत, मात्र ती संवेदनशीलता आणि तत्परता प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात आज दाखवण्याची गरज आहे. तरच हे आंदोलन अधिक बळकट होऊ शकते.











