सुरेश मिसाळ
इंदापूर : महान्यूज लाईव्ह
मी कार्यकारी अभियंत्याला आदेश दिला व त्यामुळे शेटफळ तलावात सोमवारपासून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशा बातम्या देऊन आमदार भरणे हे शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु प्रसिद्धीसाठी श्रेय घेण्याचा प्रयत्न करणारे भरणे हे साधे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीसही उपस्थित नव्हते, असा घणाघात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील केला आहे.
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचा मुद्दा मी मांडला व तो मुद्दा शेवटपर्यंत लावून धरला, त्यासाठी अनेक संदर्भ दिले. माझ्या आग्रही मागणीमुळे पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
पुणे येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार शेटफळ तलाव भरून घेण्यासाठी पाणी सोडण्यात आले असून, रविवार (दि.24) रात्री पासून हे पाणी तलावात येण्यास सुरुवात होत आहे. शेटफळ तलाव पुर्ण क्षमतेने भरून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, पुणे येथे शनिवारी ( दि. 2 सप्टेंबरला ) झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचा मुद्दा मी मांडला. परंतु तलावामध्ये पाणी सोडता येणार नाही, अशी अधिकाऱ्यांची टिप्पणी होती. मात्र बैठकीमध्ये शेटफळ तलाव पाण्याने भरून घेणे गरजेचे असल्याचा माझा मुद्दा शेवटपर्यंत मी लावून धरला, त्यासाठी अनेक संदर्भ दिले. माझ्या आग्रही मागणीमुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीमध्ये नीरा डावा कालव्याचे चालू असलेले आवर्तन दि. 20 सप्टेंबर पर्यँत संपवून, लगेच दि. 21 पासून शेटफळ तलावामध्ये पाणी सोडण्याचा निर्णय हा कालवा सल्लागार समितीमध्ये जाहीर केला व तसे बैठकीचे इतिवृत्त निघाले. परंतु दि. 21 ला इंदापूर तालुक्यातील फाटा नं.36 व 46 आवर्तन चालू होते. त्या परिसरात पाऊस नसल्याने तेथे आवर्तनासाठी 4 दिवस जास्त देण्यात आले. त्यानंतर कालवा सल्लागार समितीतील निर्णयानुसार रविवार रात्रीपासून शेटफळ तलाव भरून घेण्यास सुरुवात होत आहे. शेटफळ तलावाची पाणी साठवण क्षमता 640 एम.सेफ्टी. असून, तलावाला नवीन व्हॉल टाकला जाणार आहे. शेटफळ तलाव भरून घेण्यात येणार असल्यामुळे बावडा व परिसरातील 8-10 गावांच्या शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.
शेटफळ तलाव पाणी सोडण्याच्या निर्णयाबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा मंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार व्यक्त केले.
दरम्यान, इंदापूर तालुक्यातील शेतीच्या पाण्यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक ही महत्त्वाची असूनही विद्यमान लोकप्रतिनिधी दि. 2 रोजीच्या सदर बैठकीला उपस्थित नव्हते. त्या बैठकीत शेटफळ तलावात पाणी सोडण्याचा निर्णय मी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी करून घेतला. सध्या पाणी सोडणे हा संवेदनशील विषय असल्याने त्याचा निर्णय फक्त पालकमंत्री हे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीद्वारे तसेच जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस हे घेऊ शकतात. असे असताना मात्र तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे शनिवारपासून प्रसारमाध्यमांना मी कार्यकारी अभियंत्याला आदेश दिला व त्यामुळे त्यांनी शेटफळ तलावात सोमवारपासून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे, अशा बातम्या देऊन शेटफळ तलावात पाणी सोडण्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. लोकप्रतिनिधीनी असे श्रेय घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत उपस्थित राहिला हवे होते, असा टोलाही हर्षवर्धन पाटील यांनी आमदार भरणे यांना लगावला.